प्रतिनिधी/पंढरपूर
ऊसदर एफआरपीचे तुकडीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकार यांच्या संगनमताने व राज्य शासनाच्या दिलेल्या संमतीमुळे हा कुटील डाव खेळला जात आहे. या विरोधात सर्व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होवुन सर्वांनी या लढ्यामध्ये एकत्र यावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रवक्ता रणजित बागल यांनी केले.
सोनके ता.पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने एकरकमी एफआरपीच्याबाबत शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, सोनके गावचे माजी सरपंच तानाजी गोफणे,संतोष बागल,यशवंत बागल यांच्यासह सोनके गावातील प्रतिष्ठित मान्यवर व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना यंदाच्या ऊस गळीत हंगामासंदर्भात देखील स्वाभिमानीची भुमिका बागल यांनी विशद केली. यंदा ऊसाचे क्षेत्र जरी जास्त असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात साखर देखील तेजीत आहे.पुढे मार्च अखेरपर्यंत हे दर असेच स्थिर राहतील अशी शक्यता आहे. इथेनॉल देखील उच्चांकी दरावर आहे. याचा फायदा मात्र थेट शेतकऱ्यांना मिळायला हवा आणि यंदा एकरकमी एफआरपीसह तिनशे रूपये हे मिळालेच पाहिजेत यासाठीच यंदा हा लढा स्वाभिमानीकडुन लढला जाणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या घामाच्या दामासाठी संघर्षाची तयारी ठेवावी असे पुढे बोलताना बागल यांनी सांगीतले.