झुआरीनगर प्रतिष्ठीत वसाहतीतील घटना : पोलिसांकडून छळवणूक झाल्याचा संशय,पोलिसांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी
वार्ताहर /झुआरीनगर
झुआरीनगरातील प्रतिष्ठीत वसाहतीत एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्या करणाऱयांमध्ये पती, पत्नी व दिर अशा तिघांचा समावेश असून हे कुटुंब कर्नाटकातील बिजापूरचे आहे. या आत्महत्येमागील निश्चित कारण स्पष्ट झालेले नसले तरी एका प्रकरणात पोलीस या तिघांची चौकशी करीत होते. पोलिसांकडून त्यांची छळवणूक चालली होती असा संशय असून हे प्रकरण पोलिसांवर शेकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या प्रकरणात पोलिसांविरूध्द एफआयआर नोंद करण्याची मागणी मयतांच्या कुटुबियांनी केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार मूळ कर्नाटकातील असलेल्या पती पत्नी व दिर असे तिघे जण व त्या पती, पत्नीची मुले झुआरीनगरातील एमईएस कॉलेजजवळील प्रतिष्ठीत वसाहतीतील एका खुल्या प्लॉटमध्ये उभारलेल्या चाळीत राहात होते. या चाळीत अन्य दहा कुटुंबेही राहतात. त्या प्लॉटच्या मालकानेच या लोकांसाठी या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे. पती, पत्नी व दिर राहात असलेल्या एका घरात तिघांनीही आत्महत्या केल्याचे सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आले. मयतांची नावे हुलगप्पा अंबीगार (30), गंगाप्पा अंबीगार (25) व देवाम्मा अंबीगार (23) अशी आहेत. त्यांनी आपल्या मुलांना गावी ठेवलेले आहे. या कुटुंबातील पुरूष मजुरीची कामे करीत होते. तर महिला तेथीलच एका बंगल्यात राहणाऱया कुटुंबाकडे घरकाम करायला जात होती. मयत महिलेचा भाऊ त्याच चाळीत वेगळा राहतो. त्यानेच आत्महत्येची ही घटना प्रथम पाहिली.
संशयास्पद प्रकार पोहोचला वेर्णा पोलिसांत
या प्रकरणाची वार्ता एमईएस महाविद्यालय परिसरातील वस्तीत लगेच पसरली. सदर कुटुंब मजूरी करणारे गरीब व अशिक्षित असल्याने त्यांचा त्या लोकवस्तीत फारसा कुणाशी दाट संबंध नव्हता. मात्र, एकाच कुटुंबातील तिघांनी एकाच वेळी गळफास लावून आत्महत्या केल्याने तेथील लोकांच्या मनात संशय निर्माण झाला. त्या कुटुंबातील महिला तेथीलच एका कुटुंबात घरकाम करीत होती व तिथे काही संशयास्पद प्रकार घडला होता अशी माहितीही उघडकीस आली. हा संशयास्पद प्रकार वेर्णा पोलीस स्थानकात पोहोचला होता.
प्रकरण वेर्णा पोलिसांना शेकण्याची शक्यता
हे प्रकरण पणजी आणि त्यानंतर वास्कोतील एका बिगरसरकारी संस्थेपर्यंत पोहोचले. हे आत्महत्या प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याचे दिसत असून हे प्रकरण पोलिसांवर शेकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणासंबंधी सविस्तर माहिती स्पष्ट केलेली नाही. सध्या त्या पती पत्नी व दिराचा मृतदेह गोमेकॉच्या शवागृहात आहे. त्यांचे मृतदेह स्विकारण्यास कुटुंबाने नकार दिलेला आहे.
पोलिसी छळवणुकीमुळे आत्महत्येचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार देवाम्मा ही महिला ज्या बंगल्यात घरकाम करीत होती, त्या मालकाकडून तिच्यावर काही लाख रूपये चोरीचा आरोप झाला होता. तशी तक्रार त्या मालकाने वेर्णा पोलीस स्थानकात केली आहे. त्यामुळे या चोरीच्या तपासासाठी मयत महिला, तिचा पती, व दिराला पोलीस स्थानकात गेल्या चार पाच दिवसांपासून जावे लागले होते. काल मंगळवारीही पोलीस चौकशीसाठी घेऊन जातील अशी शक्यता होती. त्यामुळे ही मजूर मंडळी तणावात होती. या तणावातूनच त्या तिघांनी आत्महत्या केली असण्याचा दाट संशय आहे. पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावून मयतांची छळवणूक केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांकडून दबाव येत असल्याने ही मंडळी भितीच्या छायेखाली होती. या तणावातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला असून त्यांनी तिघांचेही मृतदेह स्विकारण्यास नकार दिलेला आहे. पोलिसच तिघांच्या आत्महत्येस जबाबदार असून त्यांच्याविरूध्द एफआयआर नोंद करण्यात यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.