कर्मवीर पथ ते खंडोबा माळ रस्ता – डांबरीकरणानंतर रस्त्याची पुन्हा चाळणच
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील कर्मवीर पथ ते खंडोबा माळ या मार्गावर वारंवार डांबरीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे डांबरीकरण झाल्यानंतर दोन महिन्यानंतर रस्ता उखडत आहे. याकडे संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
कर्मवीर पथ ते खंडोबा माळ अशी वाहतुक एसटी स्टॅड, राधिका रोड मार्गावर सूरू असते. दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने याच मार्गाने शहरात प्रवेश करतात. यामुळे दिवसेंदिवस वाहतूकीचा ताण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापुर्वीच या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र हे डांबरीकरण उखडले आणि खड्डे पडायला सुरूवात झाली. काही ठिकाणी रस्त्याची चाळण झाली. वाहनधारकांचा प्रवास पुन्हा खड्डयातून होऊ लागल्याने या मार्गावरील खड्डे भरण्यात आले. आणि पुन्हा डांबकरणाचे काम सुरू आहे. मात्र एकाच रस्त्यावर वारंवार डांबरीकरण करण्यात येत असल्याने या कामाची चर्चा शहरात सुरू आहे. याबाबत संबंधित प्रशासन व नगरसेवक यांनी महिती देण्यास टाळटाळ केली आहे. यामुळे एकाच रस्त्यावर डांबरीकरणाचा घाट घालून प्रभागात इतर सोयी-सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.