एक सफर…
बालवयातच ग्रामजीवन अनुभवता यावे यासाठी मार्कंडेय नगर कंग्राळी खुर्द किलबिल बालविहार या बालवाडीत शिकणाऱया मुलांना शाळेपासून अडीच ते तीन किलोमीटरचा, आंबेवाडी गावच्या हद्दीला लागून असलेल्या सह्याद्री नगर (वडगीमाळ) येथे शिक्षकांनी बैलगाडीचा प्रवास घडवून आणला.
आजच्या कॉम्प्युटर युगातील तरूण तरूणींना फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, याहू, यू टय़ूब, एसएमएस, व्हॉट्सऍप या सर्वांवर स्वार होता येतं. क्रिकेट, फुटबॉल यासारखे खेळ मैदानात खेळण्याऐवजी मोबाईल, कॉम्प्युटरवर खेळणं त्यांच्या अधिक पसंतीला उतरताना दिसतं.
तांत्रिक शिक्षणामध्ये मास्टरी मिळविलेल्या युवकांना मात्र बटाटे, कांदे, रताळी अथवा भुईमूगाच्या शेंगा झाडाला लागतात की जमिनीच्या आत हे माहीत नसलेली अनेक मुलं मुली आढळून येतात. जवारी केळी, वसई केळी व इलायची केळी यातला फरक समजणारी मुलं अपवादानेच भेटतात. पावटा आणि नेरूल्या यातला फरक तर कळतच नाही. स्थानिक गाजरं, कॅरट व गुजराथी कॅरेट यातला फरक व जिरे, शहाजीरे व बडिशेप यातला फरक किंवा तूर व चणा डाळीतील फरक जर आपण ओळखू शकत नाही तर आपण सुशिक्षित कसे?
वरील सर्व गोष्टींची माहिती सर्वांना असणे नित्यव्यवहारासाठी अतिशय गरजेचे असूनदेखील बरेचजण साधं ते समजून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाहीत. हेही तितकंच खरं म्हणा. त्यासाठी कधी कधी शेतीतील आडमार्गाने शेताला भेट द्यावी लागते. तिथल्या ढेकळांसोबत संवाद साधावा लागतो. तेव्हा कुठं थोडंफार कळू लागतं.
अगदी तसंच बैलगाडी कशी असते हे एकदा तरी बैलगाडीत पाय ठेवून अनुभवल्याशिवाय कळत नाही. पूर्वी दूर गावी जायचे असेल तर बैलगाडीशिवाय पर्याय नव्हता. परंतु काळाच्या ओघात बैलगाडीदेखील हळूहळू लुप्त होत चालली आहे. 21 व्या शतकातील मुलांना वातानुकुलीत व्होल्वो, रेल्वे, विमान, हवाबंद चारचाकी वाहनांमधून फिरताना शेतात रात्रंदिन काबाडकष्ट करणाऱया जगाच्या पोशिंद्याच्या आयुष्यातील धक्के कसे असतात अनुभवावयास मिळत नाहीत. शेतकऱयाच्या अंगवळणी पडलेले धक्के निदान एक दिवसतरी अनुभवायला हवं.
आपल्या शेतीप्रधान देशाचा वारसा सांगणाऱया व हजारो वर्षाची आपली संस्कृती जतन करणाऱया शेतकऱयांच्या बैलगाडीची सफर काय असते? तिची मौज कशी असते, बैलगाडीत बसल्यावर खड् खड् आवाज करत खाचखळग्यातून जाणारी बैलगाडी हेलखावे खात खात तिचे धक्के सहन करता करता शरीराची होणारी कसरत किती आनंददायी असते, हे कळावे म्हणून लोप पावत चाललेल्या दुर्मिळ वाहनाची महती कळावी म्हणून, शेतकरी कसे बैलांच्या गळय़ाला गळपट्टा आवळून बैलगाडीस जुंपतो, हे ढवळय़ा, पवळय़ा म्हणून ‘हुर्रर्र… हुस्सा’ म्हणून बैल कसे हाकतो, बैलांना गाडीपासून दूर करून झाडाच्या सावलीत बांधून त्यांच्या चारा पाण्याची कशी काळजी घेतो, पोटच्या मुलाबाळांसारखं प्रेमभराने त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांची कशी निगा राखतो. हे सर्व देशाच्या भावी नागरिकाला जवळून अनुभवता आले पाहिजे. यासाठी मार्कंडेय नगर कंग्राळी खुर्द किलबिल बालविहार या बालवाडीतील मुलांना सह्याद्री नगर (वडगीमाळ) येथे शिक्षकांनी बैलगाडीचा प्रवास घडवून आणला.
यानिमित्त बालचमूने खेळण्याच्या स्पर्धा व वनभोजन यामध्ये संपूर्ण दिवस घालवून एका आगळय़ाच सफरीची अनुभूती घेतली. या कामी बैलगाडी देऊन मोलाचे सहकार्य केलेले शेतकरी नारायण मुतगेकर व के. बी. पाटील यांचे विशेष आभार. या सफरीचे नियोजन शाळाप्रमुख शीतल बर्डे, सहशिक्षिका मीनाक्षी दरवंदर, गायत्री कांबळे, अनिता बेळगावकर, शुभांगी पुजारी, अनिता बाळेकुंद्री, मंजुळा कुंभार, प्रियंका कारंजी, प्रिया सुतार व विजया सुतार यांनी केले होते.
मधू पाटील, कंग्राळी खुर्द