मार्च ठरला 121 वर्षांतील सर्वात उष्ण महिना : हवामान विभागाचा अंदाज
पुणे / प्रतिनिधी
यंदाचा मार्च महिना हा भारताच्या 121 वर्षांच्या इतिहासातील सर्वात उष्ण महिना ठरला असून, मार्चमध्ये या कालावधीतील सर्वाधिक म्हणजेच सरासरी 33.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती भारतीय विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, मार्चप्रमाणे या वर्षीचा एप्रिल महिना कडक उन्हाळय़ाचा असेल, असे भाकीतही हवामान विभागाने वर्तविले आहे.
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे हे चार महिने प्रामुख्याने उन्हाळय़ाचे मानले जातात. मार्चपासून खऱया अर्थाने उन्हाळा जाणवण्यास सुरुवात होत असते. परंतु, 2022 चा उन्हाळा मागच्या शतकभरातील उन्हाळय़ापेक्षा कितीतरी तीव्र असल्याचे समोर आले आहे. मार्चमध्ये देशातील अनेक भागात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यात (मार्च 2022) सरासरी मासिक दिवसाच्या तापमानाचा पारा 33.1 अंशांवर नोंदवला गेला. हे 1901 सालानंतरचे महिन्यातील सर्वांत उष्ण तापमान ठरले आहे. 2021 मधील 33.09 डिग्री सेल्सिअसचा विक्रमही या तापमानाने मोडीत काढला आहे.
2020 आणि 2021 मध्येही मार्चमधील तापमानाने अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा 4.5 अंशांनी जास्त होते. त्यानुसार मासिक सरासरी कमाल तापमानाच्या बाबतीत मार्च 2021 मधील तापमानाची नोंद 121 वर्षातील तिसरा सर्वात उष्ण महिना म्हणून केली गेली होती. आता मार्च 2022 ने नवे विक्रम निर्माण केले आहेत. यावषी मार्चमध्ये संपूर्ण देशातील कमाल तापमान सामान्यपेक्षा 1.86 अंश सेल्सिअस जास्त आहे.
दिल्ली तापली
दिल्लीत 20 मार्च रोजी पितमपुरा मॉनिटरिंग स्टेशनवर कमाल तापमान 39.9 अंश सेल्सिअस होते, तो वर्षातील सर्वांत उष्ण दिवस होता. त्याचबरोबर दिल्लीच्या काही भागांमध्ये मागच्या दोन दिवसांत तीव्र उष्मा होता, तीन ठिकाणी कमाल तापमान 41 अंशांच्या पुढे होते. एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसातदेखील वातावरण उष्णच राहण्याचा अंदाज आहे.
जागतिक तापमानही वाढतेच
मार्चमधील वाढते तापमान हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही. जागतिक पातळीवरही याची झळ बसताना दिसत आहे. जागतिक स्तरावरही गेल्या दोन दशकांतील यंदाचे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. हवामान बदलामुळे हवामानाच्या तीव्रतेवर आणि कालावधीवर परिणाम होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
हवामानबदलाचा परिणाम
मार्च महिन्यात दोन उष्णतेच्या लाटा, पावसाचा अभाव, चक्रीवादळाच्या स्थितीमुळे तयार झालेले कमी दबावाचे क्षेत्र यामुळे उत्तर आणि मध्य भारतात उष्ण तापमान होते. जागतिक तापमान वाढ हेदेखील एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
एप्रिलही ठरणार ‘कडक’
दीर्घकाळापर्यंत दुष्काळामुळे वायव्य भारतात उष्ण हवामान निर्माण झाले आहे. येत्या 3 ते 6 एप्रिलदरम्यान वेगवेगळय़ा ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशातील बहुतांश भागात उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. मार्चप्रमाणे एप्रिल महिनाही कडक राहणार आहे. या महिन्याच्या प्रारंभीच महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह काही भागांतील तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर गेल्याचे दिसत आहे. पुढच्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. पुढच्या दहा दिवसांत सूर्याचा प्रकोप देशात असाच राहील. राजस्थान, गुजरात, मध्य भारत आणि पश्चिम हिमालयाच्या क्षेत्रात उष्णतेची तीव्रता अधिक असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
थरच्या वाळवंटातून वाहणाऱया हवेचाही प्रभाव
उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात बलुचिस्तान, मध्य पाकिस्तान व थरच्या वाळवंटातून वाहणाऱया कोरडय़ा व उष्ण हवेमुळेही उष्णतेत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.