6 वर्षात सर्वाधिक तेजी : कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त सादर केलेली माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आणि बाजारातील दिग्गज गुंतवणूक असणारी भारतीय जीवन विमा निगम(एलआयसी)ने कोरोनाच्या काळात खूप चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये 2019-20 मध्ये 2.19 कोटी नवीन पॉलीसीज सादर केल्या आहेत. मागील सहा वर्षातला हा विक्रम आहे. सोबत निगमने एकूण 159,770.32 कोटी रुपयांचे क्लेम पॉलीसीधारकांना दिलेले आहेत तसेच एकूण 215.98 लाख इतके दावे निकालात काढण्यात आल्याची माहिती आहे.
एलआयसी आपला स्थापना दिवस एक सप्टेंबर रोजी सादर करत असून त्या अगोदर कंपनीने मागील 64 वर्षात देशाच्या निर्मितीत बहुमुल्य कार्य केले त्यासंदर्भातली माहिती सादर केली आहे.
कंपनीने प्रामुख्याने एलआयसी हाऊसिंग फायनान्स, एलआयसी पेंशन फंड, एलआयसी म्युच्युअल फंड, एलआयसी कार्ड सर्व्हिसेस, आयडीबीआय बँक, एलआयसी एचएफएल केअर होम आदिंच्या माध्यमातून सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.
एलआयसीचा प्रवास हा 5 कोटी रुपयांच्या प्रारंभीच्या गुंतवणुकीसोबत 1956 साली झाला. त्याच उलाढालीसोबत आज कंपनीची असेट्स 31.96 लाख कोटी रुपयांची आहेत. निगमने आतापर्यंत एकूण 30.69 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सदरची गुंतवणूक ही शेअर बाजारासह डेट आणि अन्य साधनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
12 लाख एजंट
एलआयसीकडे सध्या 8 झोन कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 74 कस्टमर झोन, 2048 शाखा, 1,526 सेटलमेंट कार्यालये, 3,354 लाइफ प्लस ऑफिस आणि 31,556 प्रीमियम पाँईट उभारण्यात आले आहेत. कंपनीकडे 12.08 लाख एजन्ट आणि 28.92 कोटींपेक्षा अधिक पॉलीसीज आहेत.