कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी घेतली पहिली भूमिका
कोल्हापूर/प्रतिनिधी
गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात येत असल्याची माहिती सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी दिली असली तरी हे आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी घोषणा कामगारांनी केली आहे. जोपर्यंत विलीनीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केल्यांनतर इतर ठिकाणी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी मात्र आक्रमक होत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे म्हंटले आहे. यामध्ये कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरु ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यातील अन्य आंदोलकांनी देखील आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे म्हंटले आहे. तसेच आक्रमक झालेल्या कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत विलीनीकरण नाही तोपर्यंत माघार नाही असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी एकजूट राहण्याची शपथ घेतली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी केली. शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन कामावर हजर व्हावे अन्यथा दोन दिवसात कारवाईचा बडगा उचलला जाईल असा इशारा परब यांनी दिला आहे. यांनतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तुमच्या कारवाईला भीक घालणार नाही. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला दिला आहे.