प्रतिनिधी/ बेळगाव
सिद्धरामेश्वर एज्युकेशन ट्रस्टच्या एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने दि. 15 पासून नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभास प्रारंभ झाला. या अंतर्गत विद्यार्थ्यांना कॉलेजमधील विविध अभ्यासक्रमांच्या शाखांबद्दल माहिती देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लक्ष्मण जंबगी उपस्थित होते.
डॉ. जंबगी यांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमातील फरक स्पष्ट केले. डॉ. सिद्धराम महास्वामी व डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्यामुळे ही संस्था प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्तम संधी केवळ महानगरातच आहेत असे नाही तर खेडोपाडीसुद्धा आहेत. कोविडमुळे जीवनशैली बदलली असून, आपण कितीही प्रगत झालो तरी आपली संस्कृती विसरता कामा नये, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. एस. व्ही. ईटी यांनी एकाच विषयापुरता अभ्यास मर्यादित ठेवू नका तर जितके शिकता येईल तितके शिकत रहा, असे सांगितले. एकेकाळी मोबाईलवर बंदी होती. आज मोबाईलचा वापर शिक्षणासाठी अपरिहार्य झाला आहे. मात्र, त्याचा सदुपयोग करणे आवश्यक आहे, असे सांगितले. संस्थेचे चेअरमन डॉ. एफ. व्ही. मानवी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रारंभी हर्षिता आणि मेघा यांनी स्वागतगीत म्हटले. प्रा. विवेकानंद खोत यांनी स्वागत केले. डॉ. राजेंद्र गलगली यांनी कॉलेजच्या नियमांबद्दल माहिती दिली.