प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी होत आहे. अशातच राजेंद्र प्रसाद चौकातील फुटपाथ घालण्यासाठी समादेवी गल्लीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. गोंधळी गल्लीमधून वाहनधारकांची ये-जा सुरू असल्याने वाहनांची गर्दी होत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका नागरिकांना सातत्याने बसत असून ऐन सणाच्या तोंडावर राजेंद्र प्रसाद चौकातील विकासकामाचा फटका शहरवासियांना बसत आहे. कॉलेज रोडवरून समादेवी गल्लीत येणाऱया रस्त्यावर काँक्रीट घालून तात्पुरता स्लोप करण्यात आला होता. पण सदर ठिकाणी पेव्हर्स घालण्यासाठी आठ दिवसांपूर्वी काँक्रीट फोडण्यात आले होते. मात्र, सदर काम दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. याकरिता समादेवी गल्लीचे प्रवेशद्वार बॅरिकेड्स घालून बंद करण्यात आले आहे. यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचे झाले आहे. विकासकामे राबविण्यासाठी रस्ता बंद करण्यास कोणतीच हरकत नाही. पण कोणतेच नियोजन नसताना स्मार्ट सिटी योजनेची कामे राबविण्यात येत असल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. दिवाळी सणाच्या तोंडावरच अचानकपणे रस्त्यांचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावा लागत आहे. शहरात येण्यासाठी समादेवी गल्ली हा मुख्य रस्ता असल्याने नागरिक या रस्त्याने येत असतात. पण रस्ता बंद झाल्याने किर्लोस्कर रोड आणि गोंधळी गल्ली रस्त्याने प्रवेश करावा लागत आहे. परिणामी किर्लोस्कर रोड आणि गोंधळी गल्ली परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शहरात आल्यानंतर पार्किंगची समस्या भेडसावत असते. अशातच रस्ता बंद ठेवण्यात आल्याने वाहनधारकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. लॉकडाऊननंतर प्रथम सणाची खरेदी करण्यासाठी नागरिकांना सुट मिळाली आहे. सध्या शाळांना सुटी असल्याने नागरिक खरेदीकरिता शहरात येत आहेत. शनिवार व रविवार सुटीचा दिवस मिळाल्याने बाजारपेठेत गर्दी झाली होती. गोंधळी गल्लीत वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्मार्ट सिटी कामाच्या अयोग्य नियोजनामुळे गोंधळी गल्लीतील व्यापाऱयांसह वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.