केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती – विरोधकांवर साधला निशाणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑक्सिजनच्या अभावी झालेल्या मृत्यूंची संख्या पंजाब व्यतिरिक्त कोणत्याही राज्याने दिली नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. तसेच रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांमध्ये वाढ झालेली असताना काही राज्ये विनाकारण अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर्सची मागणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना हा दावा करत आरोग्यमंत्र्यांनी दिल्ली सरकारसह विरोधकांवर निशाणा साधला.
कोरोनाच्या काळात देशात ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरून मोठे राजकारण करण्यात आले. दिल्लीच्या रस्त्यांवर ऑक्सिजनचे टँकर फिरत राहिले पण त्याचा राज्यांकडून वापर करण्यात आला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले. राज्यांनी कोरोनामुळे झालेल्या मृतांची आकडेवारी द्यावी, ती लपवू नये, असे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितले होते. पण, राज्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. काही राज्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी केली, असा निर्वाळाही आरोग्यमंत्र्यांनी चर्चेदरम्यान दिला.
देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सुरु झालेल्या चर्चेला शुक्रवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी उत्तर दिले. चर्चेदरम्यान त्यांनी कोरोनाची स्थिती, उपचारपद्धती, लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय साहित्याची उपलब्धता अशा सर्व मुद्दय़ांची विस्तृतपणे माहिती दिली. याचवेळी कोरोना काळात ऑक्सिजनअभावी देशात किती मृत्यू झाले हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला. केवळ पंजाब सरकारने ऑक्सिजनअभावी चार संशयितांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारने राज्यांना तीनवेळा पत्रे पाठवून यासंबंधी रितसर माहिती पाठविण्याची सूचना केली. तथापि, 19 राज्यांनी दिलेल्या उत्तरांपैकी केवळ पंजाबने 4 मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.