शासनाच्या पुरवठा विभागांना सूचना, सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश
प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाचे संकट कायम असल्याने सप्टेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्याचे वाटप करा अशा सूचना शासनाने पुरवठा विभागांना दिल्या आहेत. मात्र आता केवळ ऑनलाईन नावे असणाऱयांनाच हे धान्य दिले जाणार आहे. चिपळूण तालुक्यात धान्याचे वाटप सुरू असून यावेळी गहूही दिला जात आहे. तसेच एपीएल शिधापत्रिकाधारकांनाही कमी दरातील धान्य देऊन दिलासा देण्यात आला आहे.
मार्च महिन्यापासून निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीमुळे अनेकांचे रोजगार व नोकऱया गेल्याने त्यांच्यावर उपासमार येऊ नये म्हणून शासनाने एप्रिल, मे, जून हे तीन महिने गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य दिले. याचा तालुक्यातील 45 हजार 139 शिधापत्रिकाधारकांना फायदा झाला आहे. ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फायदा होत असल्याने व कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असल्याने यापुढे हे मोफत धान्य मिळणार की नाही, असा प्रश्न शिधापत्रिकाधारकांना पडला होता. असे असतानाच काही दिवसांपूर्वी नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा शासनाने केली आहे.
त्यानुसार सध्या सप्टेंबरपर्यंत धान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच काही बदलही करण्यात आले असून शिधापत्रिकेवर अनेक नावे असली तरी धान्य केवळ ऑनलाईन नावे असणाऱयांनाच द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी माणसी पाच किलो तांदूळ व दोनप्रकारच्या डाळी देण्यात आल्या होत्या. मात्र आता माणसी 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू दिला जात आहे. सध्यातरी डाळी उपलब्ध झाल्या नसून त्या मिळण्याची शक्यता आहे. नियमित धान्य हे शिधापत्रिकेवरील नावांप्रमाणे दिले जाणार आहे.
तालुक्यात 169 रास्त धान्य दुकाने आहेत. त्यातील सध्या बहुतांशी दुकानांमध्ये धान्य वाटप सुरू असले तरी काही दुकानदारांना अद्याप धान्याचा पुरवठा संबंधित ठेकेदाराकडून झालेला नाही. त्यामुळे येत्या चार दिवसांत हे धान्य दुकानदारांपर्यंत जाणार असून त्यानंतर त्याचे शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाणार आहे. याचबरोबर अनेक वर्षानंतर एपील (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांचे धान्य दिले गेले. यावेळीही त्यांच्यासाठी धान्य उपलब्ध झाले असून त्यांना माणसी 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू दिला जात आहे. या तांदळाचा दर प्रतिकिलो 12 रूपये, तर गहू 8 रूपये किलोने दिला जात आहे. खुल्या बाजारात धान्याचे दर दरदिवशी वाढत चालले असल्याने या धान्याचा त्यांना मोठा फायदा होत आहे.