पालकवर्गाची जोरदार मागणी : दुहेरी अडचणीत येत असल्याचा दावा
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील शाळांनी सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांबरोबरच पालकही दुहेरी अडचणीत सापडलेले आहेत. ही ऑनलाईन पद्धतच बंद करण्याची मागणी मोठय़ा प्रमाणात पालकवर्गातून होत आहे.
ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था ही खरे तर 9वी व 10 वी इयत्तेसाठी वा त्यापुढील विद्यार्थीवर्गासाठी राबवता येऊ शकते. परंतु इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून सर्वच इयत्तेतील लहान लहान मुलांना देखील ही योजना लागू केल्याने पालकांना नाईलाजास्तव छोटय़ा बालकांच्या हाती मोबाईल देण्याची पाळी आलेली आहे.
मोबाईलचे साईड इफेक्टस्ही अनेक
मोबाईल हा प्रकार जेवढा उपयुक्त तेवढेच त्याचे साईड इफेक्टस् देखील जास्त असल्याने पालक विद्यार्थ्यांच्या हाती तो देण्यास तयार होत नसतात. अनेक शाळांनी मोबाईलवर शाळेत बंदी घातली असली तरी त्याच शाळांना सध्या मोबाईलवरच मुलांना शिक्षण देण्याची पाळी आली आहे.
कामावर जाणाऱया पालकांची होतेय अडचण
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना देखील कित्येक शाळांनी मोबाईल वा टॅब सक्तीचे केलेले आहेत. दोन ते अडिच तास प्रशिक्षण देतेवेळी मुलांना मोबाईलसमोर बसवून ठेवणे पालकांसाठी फार मोठे आव्हान बनले आहे. काहीवेळा मोबाईलला रेंज नसल्याने पालकांची धांदल उडते. तसेच ऑनलाईन वर्ग असल्याने घरातील कोणाला ना कोणालातरी सक्तीने बालकांसमोर रहावे लागते. ज्यांच्या घरात आई वा वडील दोघेही कामावर जातात, अशा पालकांची धांदल तर काही विचारूच नका, त्यामुळे या ऑनलाईन शिक्षणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांनाही सक्ती
राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण सक्तीचे नाही, असे कळविले तरी देखील खाजगी शाळा व्यवस्थापनांनी ऑनलाईन शिक्षण चालूच ठेवले आहे. त्यातल्या त्यात आश्चर्याची बाब म्हणजे पूर्व प्राथमिक शाळांतील मुलांना देखील सध्या सक्तीने ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. जी मुले ऑनलाईन येत नाहीत, अशा मुलांना शाळा व्यवस्थापनाकडून त्रास दिला जात आहे. मुले अज्ञानी आहेत. थेट त्रास पालकांना होतोय. काही शाळांनी तर जमत नसेल तर शाळेतूनच नाव काढा, असा इशारा दिलेला असल्याने पालक मूग गिळून गप्प राहात आहेत.
प्राथमिक व पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन शिक्षण म्हणजे हद्दच झालेली आहे. या मुलांच्या डोक्यावर विपरित परिणाम होतील आणि अशा छोटय़ा मुलांच्या हाती मोबाईल देऊन त्यांना बिघडवून टाकण्याचाच प्रकार वाढू शकतो. अनेक पालकांनी या ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
दरम्यान 9वी, 10वी, तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांनाही कैकवेळा चार ते साडेचार तास मोबाईल, टॅब वा लॅपटॉप समोर बसून राहावे लागत आहे. त्यांच्याही डोक्यावर परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.