जीएंच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम रंगला : रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
जी.एं.च्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मेधा मराठे यांनी ‘जीए कथा’ हा कार्यक्रम बुधवारी वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात सादर केला. संघासह मंथन व लोकमान्य ग्रंथालय यांच्यावतीने हा कार्यक्रम झाला. यामध्ये ‘ऑर्फियस’, ‘राधी’ व ‘चैत्र’ या तीन कथांचे नाटय़ात्मक रुपांतर सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- बेळगाव नावाच्या गावास
- पाऊले जरी दूर भटकत गेली,
- तरी तुझ्या आठवणींची बुत्ती,
- सतत जवळ राहिली आहे
जी. ए. कुलकर्णी यांनी रमलखुणा पुस्तकाला लिहिलेली ही अर्पण पत्रिका आहे. जी.एं.चं गाव बेळगाव. येथील महादेव गल्लीत त्यांचा जन्म झाला. बेळगावच्या मातीने त्यांना माणसांचा हर्ष-खेद, जगणं-मरणं, मानवी स्वभावाचे विश्वरुप दर्शन घडविले. त्यांच्या घरात माणसांची नुसती गर्दी होती. येथील आपल्या वास्तव्यादरम्यान त्यांनी जे निरीक्षण केले त्याच्या अनेक कथा
आहेत. यामध्ये ‘ऑर्फियस’, ‘राधी’ व ‘चैत्र’ या कथांचे नाटय़ात्मक रुपांतर सादर करण्यात आले. मानवी जीवनाचे काही प्रयोजन आहे का?, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी शक्ती कोणती?, तिचा हेतु कोणता?, माणसाला भोग का भोगावे लागतात?, त्याच्या जीवनयात्रेचे फलित काय? या प्रश्नांची उत्तरे जीएंनी आर्फियस कथेत शोधण्याचा प्रयत्न
केला.
राधी ही तर गाजलेली कथा. महादेव गल्ली आणि परिसर परिचित असल्याने श्रोत्यांना ही कथा आवडली. त्या काळी पती हयात आहे की नाही, या संभ्रमात असणारी राधी केवळ आबांच्या मूक पाठिंब्यामुळे तग धरून आहे. ती अपशकुनी असा बोलबाला आहे. पण ती कोणाशीच दुरुत्तरे करत नाही. अत्यंत दुर्दैवी मरण तिला आले. परंतु आयुष्याच्या मध्यंतरात बाळय़ा या छोटय़ा मुलाला ती माया लावते. वास्तवातले जगणे आणि राधीचे अनिश्चित जगणे या भावविश्वात बाळय़ा जगतो आणि त्याचे मनोगत आपल्याला भिडते. कारण तोपर्यंत राधी आपली झालेली असते. चिन्मय शेंडे व प्रिया काळे यांनी हे कथात्म नाटय़ रंगविले.
विधवा स्त्राr ही अपशकुनी असेच मानले जाण्याचा काळ. त्यामुळेच हळदी-कुंकवाला जाण्याचे टाळणाऱया स्त्राrची गोष्ट चैत्र या प्रसंगातून उलगडली गेली. जीएंच्या कथांनी अनेकांवर गारुड केले. त्यांची कथा हृदयाला स्पर्श करतेच, नव्हे चटका लावते. सुन्न करते, अंतर्मुख करते, प्रश्न उपस्थित करते, उत्तरे मिळतीलच असे नाही. परंतु ‘माणूस मानवी मर्यादांच्या चौकटीतच वावरणार आणि सुख-दुःखापासून त्याची सुटका नाही’ हे मात्र या कथा सुचित करतात. याच कार्यक्रमात जीएंनी श्री. पु. भागवत व अमोल पालेकर तसेच जयवंत दळवी यांना लिहिलेल्या पत्रांचे वाचन करण्यात आले. विद्या देशपांडे यांची वाचनशैली उत्कृष्ट. ऑर्फियस कथा मेधा मराठे, अर्चना ताम्हणकर, सुधीर व चिन्मय शेंडे यांनी भाव छटांसह उत्तम सादर केली. नुपूर रानडे हिने बाल वयातील भाव छटा चांगल्या व्यक्त केल्या. दीड तासाच्या कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले, हेच या सादरीकरणाचे यश होय.