नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय पुरुष हॉकी वर्तुळाच्या दृष्टीने टोकियोत जिंकलेले ऑलिम्पिक कांस्य ही निव्वळ सुरुवात आहे. नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आता जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब करणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल, असे स्पष्ट प्रतिपादन आघाडीचा हॉकीपटू शमशेर सिंग याने केले. मागील महिन्यात संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदकाची कमाई केली. कांस्यपदकासाठी झालेल्या प्ले-ऑफ लढतीत भारताने जर्मनीचा 5-4 असा पराभव केला. या क्रीडा प्रकारात भारतासाठी 41 वर्षांनंतरचे ते पहिलेच पदक ठरले.
‘संघ या नात्याने आम्हाला अद्याप अनेक उद्दिष्टय़े साध्य करायची आहेत. ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे लक्ष्य साध्य झाले आहे. मात्र, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम संघांपैकी एक बनण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून आपण झगडत आहोत’, असे शमशेरने हॉकी इंडियातर्फे जारी केलेल्या पत्रकातून नमूद केले.
यापुढेही भविष्यात आम्ही ज्या-ज्या सामन्यात खेळू, त्या-त्या प्रत्येक सामन्यात अगदी सर्वस्व पणाला लावून लढू. एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धेत त्याची प्रचिती येईल. प्रत्येक सामन्यागणिक सरस कामगिरी साकारता येईल, याची आम्हाला पूर्ण खात्री वाटते. आम्ही एक दिवस निश्चितपणाने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान होऊ. टोकियो ऑलिम्पिकचे आमच्या हृदयात खास स्थान आहे. कारकिर्दीच्या अगदी प्रारंभी ऑलिम्पिक कांस्य जिंकणाऱया संघाचा सदस्य राहिलो, याचा अभिमान आहे’, असे शमशेर पुढे म्हणाला.
‘संघ या नात्याने ही सुरुवात आहे, याची मला खात्री आहे. आगामी वर्षात जे लक्ष्य निश्चित केले आहे, ते साध्य करण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहणार आहोत’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
टोकियोत इतिहास रचण्यामागे कोणती बाब सर्वाधिक महत्त्वाची राहिली, या प्रश्नावर बोलताना त्याने हार न मानण्याची वृत्ती महत्त्वाची ठरली, असे उत्तर दिले. ‘आम्ही जर्मनीविरुद्ध त्या प्ले-ऑफ लढतीत वास्तविक पिछाडीवर होतो. मात्र, संधी मिळू शकते आणि आपण बाजी पलटवू शकतो, यावर आमचा विश्वास होता. सरतेशेवटी आम्हाला अपेक्षित संधी मिळाली आणि आम्ही प्रतिस्पर्ध्यांना दडपणाखाली आणत कांस्यपदकावर मोहोर उमटवू शकलो’, असे तो तपशीलवार बोलताना म्हणाला.