महिला टी-20 विश्वचषकात भारताला उपविजेतेपद, ऍलीसा हीली सामन्यात, बेथ मुनी स्पर्धेत सर्वोत्तम
वृत्तसंस्था/ मेलबर्न
यजमान ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतीय महिलांचे पहिल्यांदा टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळविताना 85 धावांनी दणदणीत विजय मिळवित पाचव्यांदा विश्वचषक पटकावला. सामन्यात सर्वोत्तम ठरलेली ऍलीसा हीली, स्पर्धेतील सर्वोत्तम ठरलेली बेथ मुनी आणि मेगन स्कट (4 बळी) व जोनासेन (3 बळी) या ऑस्ट्रेलियन विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
भारतीय संघाची स्पर्धेतील कामगिरी पाहता अंतिम लढत अतिशय चुरशीची होईल, अशी अपेक्षा केली जात होती. पण या निर्णायक सामन्यातच भारतीयांनी साफ निराशा केल्याने अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियन महिलांनी मात्र नियोजनबद्ध आक्रमक खेळ करीत भारतीय संघाला सर्व आघाडय़ांवर नामोहरम करीत जेतेपद पटकावले.
नाणेफेक जिंकल्यानंतर मेग लॅनिंगने फलंदाजी स्वीकारली आणि सलामीवीर हीली व बेथ मुनी धडाकेबाज 115 धावांची शतकी सलामी देत विजयाचा पाया रचला. हीलीने केवळ 39 चेंडूत 75 धावा झोडपताना 7 चौकार, 5 षटकार ठोकले तर अखेरपर्यंत नाबाद राहत संघाचा विजय निश्चित करणाऱया मुनीने 54 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 78 धावा फटकावल्या. या दोघींच्या दणकेबाज अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 4 बाद 184 धावांचा डोंगर रचला. आणि प्रथमच अंतिम फेरीत खेळणाऱया भारतीय खेळाडूंना परिस्थितीचे, प्रचंड गर्दीचे, अपेक्षांचे आणि धावांचे मोठे दडपण पेलवता न आल्याने त्यांचा डाव 19.1 षटकांत केवळ 99 धावांत आटोपला. भारतीय स्पिनर पूनम यादवची त्यांना सर्वात भीती होती. पण तिची व राजेश्वरी गायकवाडची गोलंदाजी सावधपणे खेळून काढत ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी त्यांना निष्प्रभ ठरविले आणि अन्य गोलंदाजांवर हल्ला करीत विजयात मोलाची भूमिका बजावली.
पूनम यादवला 30 धावांत केवळ 1 बळी मिळाला तर राजेश्वरीला 29 धावांत एकही बळी मिळविता आला नाही. दीप्ती शर्मा, राधा यादव, शिखा पांडे (0-52 धावा) यांना चोप सहन करावा लागला. दीप्तीने मात्र 2 बळी मिळविले. 2003 मध्ये झालेल्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेत पाँटिंगच्या संघाने आखलेले डावपेच त्यांच्या महिला संघाने येथे उपयोगात आणले. गांगुलीच्या टीम इंडियाला त्यावेळी अंतिम फेरीत मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. येथील सामन्यासाठी हीलीचा पती मिशेल स्टार्क तिला प्रोत्साहित करण्यासाठी खास उपस्थित राहिला होता.
चौथ्या षटकात भारताची स्थिती 3 बाद 18 अशी झाली तेव्हाच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. कर्णधार हरमनप्रीत बाद झाल्यावर ती 4 बाद 30 आणि वेदा कृष्णमूर्ती परतल्यावर 5 बाद 58 अशी झाली. या स्पर्धेत तुफानी फटकेबाजी करून क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतलेली किशोरवयीन शेफाली वर्मा पहिल्याच षटकात बाद झाली. या धक्क्यातून भारतीय संघ नंतर सावरलाच नाही. दीप्ती शर्मा (33) व रिचा घोष (18) यांनी सहाव्या गडय़ासाठी 30 धावांची भागीदारी केली, ही भारतीय डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. त्याआधी दीप्तीने वेदासमवेत 28 धावांची भर घातली होती. यष्टिरक्षक तानियाला डोक्याला चेंडू लागल्याने तिच्या जागी रिचा घोषला बदली खेळाडू म्हणून खेळविण्यात आले. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली होती. पण यजमान संघ अनुभवी असल्याने त्यांना फेव्हरिट मानले जात होते.
बेथ मुनीने ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक धावा जमविल्या तर हीली आक्रमक होती. या दोघींनी जीवदानांचा पुरेपूर लाभ घेत अर्धशतके झळकवली. नंतर मुनीने 3 झेलही टिपले. हीलीला पाचव्याच चेंडूवर शेफाली वर्माकडून दीप्तीच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले होते. या जोडीने 11.5 षटकांत 115 धावांची भागीदारी केली. मुनीला राजेश्वरीकडून स्वतःच्याच गोलंदाजीवर चौथ्या षटकात जीवदान मिळाले होते. 12 व्या षटकात वेदाने लाँगऑन क्षेत्रात हीलीचा झेल टिपला. ती बाद झाल्यावर मुनीने लॅनिंगसमवेत 39 धावांची भर घातली. दीप्तीने 17 व्या षटकांत लॅनिंग (15 चेंडूत 16) व गार्डनर यांना बाद केले. गार्डनरला तानियाने यष्टिचीत केले तर लॅनिंगचा झेल शिखाने टिपला. अखेरच्या टप्प्यात भारतीयांनी बऱयापैकी गोलंदाजी केल्याने यजमान संघाला दोनशेचा टप्पा गाठता आला नाही.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलियन महिला 20 षटकांत 4 बाद 185 : हीली 75 (39 चेंडूत 7 चौकार, 5 षटकार), बेथ मुनी नाबाद 78 (54 चेंडूत 10 चौकार), लॅनिंग 16 (15 चेंडूत 2 चौकार), गार्डनर 2, हेन्स 4, कॅरे नाबाद 5, अवांतर 4. गोलंदाजी : दीप्ती शर्मा 2-38, शिखा पांडे 0-52, गायकवाड 0-29, पूनम यादव 1-30, राधा यादव 1-34.
भारतीय महिला 19.1 षटकांत सर्व बाद 99 : शेफाली 2, स्मृती मानधना 11 (8 चेंडूत 2 चौकार), भाटिया 2, जेमिमा रॉड्रिग्ज 0, हरमनप्रीत 4, दीप्ती शर्मा 33 (35 चेंडूत 2 चौकार), वेदा कृष्णमूर्ती 19 24 चेंडूत 1 चौकार), रिचा घोष 18 (18 चेंडूत 2 चौकार), शिखा 2, राधा यादव 1, पूनम यादव 1, गायकवाड नाबाद 1, अवांतर 5. गोलंदाजी : मेगन स्कट 4-18, जोनासेन 3-20, मोलिनॉ 1-21, किमिन्स 1-17, कॅरे 1-23.
महिला क्रिकेटच्या अंतिम लढतीसाठी गर्दीचा विक्रम
या अंतिम लढतीसाठी एमसीजीवर 86,174 पेक्षकांनी गर्दी केली होती. ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला क्रिकेटच्या अंतिम लढतीसाठी नोंद झालेली सर्वाधिक उपस्थिती आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सर्वच आघाडय़ांवर चमकदार प्रदर्शन करीत जेतेपद पटकावून चाहत्यांना खुश केले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 या वर्षी या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
शेफालीला दोष देता येणार नाही : हरमनप्रीत
16 वर्षीय शेफाली वर्माने हीलीला पहिल्याच षटकात जीवदान दिले आणि नंतर फलंदाजीतही तिने निराशा केली. पण भारताच्या पराभवासाठी तिला दोष देता येणार नाही. ती षोडशवर्षीय असून पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. तरीही तिने खूप चांगले प्रदर्शन करून संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात मोलाची कामगिरी केली. एवढय़ा लहान वयात सतत सकारात्मक विचार करून लक्ष केंदित करणे कठीण असते. असे कोणाच्याही बाबतीत घडू शकते. मात्र तिच्यासाठी हा बोध घेणारा अनुभव होता. त्यामुळे तिला दोषी ठरविले जाऊ नये. इतरांची कामगिरीही पराभवाला कारणीभूत आहे, असे कर्णधार हरमनप्रीत म्हणाली.
अंतिम फेरीत प्रचंड गर्दीसमोर खेळण्याचे दडपण आल्याचा हरमनप्रीतने इन्कार केला. ‘आमच्यावर अजिबात दडपण नव्हते. पण मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात आम्ही कमी पडलो. आमच्यासाठी हा धडा असून क्षेत्ररक्षणावेळी शंभर टक्के योगदानाची गरज असते. कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हाच सर्वात महत्त्वाचा घटक असतो,’ असे ती म्हणाली. या स्पर्धेत भारतीय संघात युवा खेळाडूंचाच अधिक भरणा होता आणि या संघावर पूर्ण भरवसा असल्याचेही ती म्हणाली.