अपघातासह वाहतूक ठप्प होण्याची शक्यता
ओटवणे /प्रतिनिधी-
चराठा – ओटवणे घाटरस्त्या दरम्यान धोकादायक वळणावर अतिवृष्टीमुळे संरक्षक कठडयासह रस्ता खचला आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता असुन याची त्वरीत डागडुजी न केल्यास हा रस्ता आणखी खचून ओटवणे दशक्रोशीतील वाहतूकच ठप्प होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची त्वरीत दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ओटवणे दशक्रोशीतील वाहन चालकामधून होत आहे.
दरम्यान गेल्या वर्षीही याच धोकादायक वळणावरचरस्ता खचलेला होता. त्यावेळी तात्पुरती या डागडुजी करण्यात आली. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना केल्यामुळेच पुन्हा या ठीकाणी अतिवृष्टीत संरक्षक कठडयासह हा रस्ता खचला आहे. ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. ओटवणे दशक्रोशीतील जनतेला सावंतवाडीत येण्या जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या खचलेल्या संरक्षक कठडयासह त्याची रस्त्याची त्वरीत डागडुजी न केल्यास हा पूर्ण रस्ता खचून वाहतूक ठप्प झाल्यास ओटवणे दशक्रोशीतील जनतेला कारीवडे मार्गे सावंतवाडी गाठावी लागणार आहे.