ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना औरंगाबाद मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गावर यशस्वी मात करुन घरी परतलेल्या जिल्ह्यातील वैजापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्षांचे रविवारी रात्री त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केले. या जंगी स्वागतमध्ये माजी उपनगराध्यक्षांसह शेकडो जणांनी सहभाग घेतला होता. हे जंगी स्वागत चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी आता माजी उपनगराध्यक्षांसह 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्षांना 27 जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना धूत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांंनी कोरोनावर मात केली आणि त्यांना रविवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व नियम व आदेश धुडकावून मोठ्या संख्येने गर्दी केली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. या सर्व प्रकारची दाखल घेत वैजापूर पोलिसांनी माजी उपाध्यक्षांसह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या औरंगाबादमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादमध्ये आज सकाळी 150 कोरोना रुग्णांची वाढ झाली. यामध्ये मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 49 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6880 वर पोहोचली आहे. त्यापैकी 3374 रुग्ण बरे झाले असून 310 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर 3196 जणांवर उपचार सुरू आहेत.