ऑनलाईन टीम / मुंबई :
1947 साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असं वक्तव्य करुन वाद निर्माण करणारी अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले. कंगनाने महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वांची खिल्ली उडवली आहे. गांधींना सत्तेची भूक होती. दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही, असं म्हणत कंगनाने गांधींवर निशाणा साधला.
कंगनाने इन्स्टाग्रामवर एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी शेअर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एका ब्रिटीश न्यायाधीशाकडे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जीना यांनी सुभाषचंद्र बोस भारतात आले तर त्यांना इंग्रजांच्या तायात देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असं या बातमीवर लिहिण्यात आलं आहे.
कंगना पुढे म्हणाली, ज्यांच्यामध्ये जुलमांशी लढण्याची हिंमत नव्हती त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटीशांच्या हवाली केलं. या लोकांना सत्तेची भूक होती. हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला शिकवले की कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. त्यामुळे आपला हिरो हुशारीने निवडा.