रोपर येथे जमावाने कार रोखली – माफीची मागणी
चंदिगढ / वृत्तसंस्था
शेतकऱयांना खलिस्तानी दहशतवादी संबोधल्याच्या रागातून शुक्रवारी अभिनेत्री कंगना राणावतवर हल्ला करण्यात आला. रोपरमध्ये जमावाने अभिनेत्रीच्या कारला घेराव घालत माफीची मागणी केली. मनालीहून चंदिगढच्या दिशेने जात असताना रोपरमध्ये चंदिगढ-उना महामार्ग जाम करून कंगनाच्या वाहनताफ्याला थांबवण्यात आले. याठिकाणी शेतकऱयांशिवाय पोलीसही मोठय़ा संख्येने तैनात होते. पण जमावाने कंगनाची गाडी रोखून धरत माफीनाम्याची मागणी केली.
कंगना राणावतने स्वतःच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबतच पंजाबमध्ये पाऊल ठेवताच जमावाने आपल्यावर हल्ला केल्याचे तिने नमूद केले आहे. हल्ला करणारे लोक स्वतः शेतकरी असल्याचे सांगत होते, असेही तिने लिहिले आहे. बऱयाच धडपडीनंतर जमावाने कंगनाला जाऊ दिले. यानंतर कंगनाने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ‘मी पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे आभार. पंजाब पोलीस आणि सीआरपीएफचेही आभार’ असे कंगनाने म्हटले आहे. शेतकऱयांना खलिस्तानी दहशतवादी संबोधल्याचा आरोप कंगनावर होत असल्याने तिला शेतकऱयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.