हरकुळ, शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी : नळयोजनांवर परिणाम शक्य
वार्ताहर / कणकवली:
उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्यानंतर पाण्याच्या पातळीत घट होऊन नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत. पावसाळ्य़ाला अजून महिना असताना घटत चाललेली पाण्याची पातळी सर्वांच्याच चिंतेत भर टाकणारी ठरत आहे. नद्यांलगत असलेल्या नळयोजनेच्या विहिरींना याचा फटका बसत असून जानवली नदीत हरकुळ धरणाचे व गडनदीत शिवडाव धरणाचे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
जानवली व गडनदीलगत असलेल्या नळयोजनेच्या विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याने या विहिरींवर अवलंबून असलेल्या नळयोजना बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. पुढील महिनाभर पाण्याची टंचाईसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. काही नद्यांना घालण्यात आलेले कच्चे बंधारे हे तात्पुरती उपाययोजना ठरत आहेत. ज्या नदींवर पक्के बंधारे आहेत, तेथे काही प्रमाणात पाण्याचा साठा आहे. मात्र, तो साठा किती दिवस राहील, याबाबत साशंकता आहे.
जानवली नदीलगत काही प्रमाणात उस शेती केली जाते. या शेतीसाठी पाण्याचा अमर्याद उपसा केला जातो. त्यामुळेही नद्यांची पाणी पातळी घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजून काही दिवस या शेतीला पाणी देण्याची गरज असल्याने या कालावधीत पाणी असलेल्या नद्या पूर्णत: कोरडय़ा पडण्याची शक्यता आहे. जानवली नदीत हरकुळ धरणाचे पाणी सोडल्यास त्याचा फायदा उस शेतीसोबतच त्या नदीलगतच्या नळयोजनांना होणार आहे. कणकवली मराठा मंडळानजीच्या केटी बंधाऱयातील पाण्याची पातळी घटत असताना, शिवडाव धरणाचे पाणी सोडल्यास या नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होऊन त्याचा फायदा होणार आहे.