प्रतिनिधी / सांगली
खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथील मयत शिपायाच्या पत्नीकडे पेन्शन (फॅमिली पेन्शन) सुरू करण्यासाठी एक हजाराची लाच मागितली. सोमवारी लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या दोन लिपिकांसह तिघांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे यांनी केली.
ही एक हजाराची लाच स्वीकारताना पोपट रंगराव पडळकर (वय 54), कनिष्ठ लिपीक, सुभाष गंगाराम पोतदार (वय 54) कनिष्ठ लिपीक आणि दाजी पाटलोनी विद्यालय वेजेगाव ता. खानापूरमधील सेवानिवृत्त क्लार्क विश्वास गणपती पाटील (वय 59) या तिघांना पकडण्यात आले आहे. या तिघांनी लाच मागणी केल्याची तक्रारदार संबंधित तक्रारदारंनी दोन दिवसापूर्वी लाचलुचपत अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावेळी मोबाईलवर झालेल्या संभाषणाची माहितीही तिने दिली होती.या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यानंतर लाचलुचपतचे निरीक्षक गुरूदत्त मोरे यांनी तातडीने सोमवारी जिल्हा परिषदेच्या आवारात सापळा लावला होता. सोमवारी दुपारी हे तिघेजण जिल्हा परिषदेच्या आवारातच तक्रारदारांकडून लाच घेताना रंगेहात सापडले त्यानंतर या तिघांना लाचलुचपत अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर अटक केली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या पतीचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले आहे. त्यानंतर या महिलेस पेन्शन सुरू करण्यासाठी या तिघांनी पैशाची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण केल्यानंतरच हे काम होईल असे सांगितल्याने या तक्रारदारांनी लाचलुचपत अधिकाऱयांशी संपर्क साधून ही तक्रार दिली. या लाच घेणाऱया तिघांना रंगेहाथ पकडून दिले. या तिघांना पकडल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये मात्र जोरदार खळबळ माजली आणि प्रत्येक विभागात या लाचेच्या कारवाईची चर्चा सुरू झाली होती. ही कारवाई पोलीस कर्मचारी सुनील कलकुटगी, अविनाश सागर, जितेंद्र काळे, भास्कर भोरे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, राधिका माने, सारिका साळुंखे, अश्विनी कुकडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.