हुतात्म्यांचे स्मरण करून सीमा लढ्याची पुढील दिशा ठरविणे ही काळाची गरज
वार्ताहर /किणये
सीमाप्रश्नाचा लढा राज्यघटनेला अनुसरून आहे अहिंसेचा हा लढा आहे. समस्त सीमाभागातील सीमा बांधवांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी या लढ्यामध्ये अनेकांनी त्यागाची भूमिका बजावली आहे. काहीजण या लढ्यासाठी हुतात्मे झाले. या हुतात्म्यांचे स्मरण करून या लढ्याची पुढील दिशा ठरविणे ही काळाची गरज आहे. 37 वर्षांपासून कन्नड सक्तीविरोधी आंदोलन सुरू आहे. मात्र आम्हाला न्याय मिळत नाही. ही लोकशाहीची शोकांतिका आहे. महाराष्ट्र सरकारने आता सीमाप्रश्नाच्या लढाईसाठी सक्रिय भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. असे मनोगत तालुका म. ए. समितीचे नेते मनोज पावशे यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले.
6 जून 1986 रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात बेळगुंदी गावातील भावकू चव्हाण, मारुती गावडा, कल्लाप्पा उचगावकर हे तिघेजण हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना मंगळवारी सकाळी बेळगुंदी येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून म्हात्रू झंगऊचे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, नीलिमा पावशे, आर. एम. चौगुले, रामचंद्र पाटील, सुभाष हादगल, देवाप्पा शिंदे, नाना पाटील, शिवाजी शिंदे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. सीमाभागात कन्नडसक्ती लागू करण्यात येत आहे. सीमाबांधवांना मराठीतून परिपत्रके मिळत नाहीत. येथील मराठी बहुभाषिकांवर हे सरकार अन्याय करत आहे त्यामुळे सर्वांनी अन्यायाच्या विरोधात एकजुटीने आवाज उठविला पाहिजे, असे अॅड. एम. जी पाटील यांनी सांगितले. सीमाभागातील नागरिकांनी या हुतात्म्यांचे स्मरण करून जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी सांगितले. आर. एम. चौगुले, निंगाप्पा जाधव, कृष्णा हुंदरे, रामचंद्र पाटील आदींची भाषणे झाली. राजू किणयेकर, शट्टुपा चव्हाण, पुंडलिक पावशे, नारायण सांगावकर आदींसह पश्चिम भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.