वारंवार बंद होत असल्याने अंधाराचे साम्राज्य
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पथदीप नादुरुस्त झाल्याने बंद असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. पण याकडे पथदीप कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाले आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलासह परिसरातील पथदीप वारंवार बंद होत आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली, पण पुन्हा दोनच दिवसात बंद पडले आहेत. परिणामी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
महापालिका व्याप्तीमधील विविध भागातील पथदीप आणि हायमास्ट दिवे बंद असल्याच्या तक्रारी होत आहेत. याची दखल घेण्याकडे पथदीप कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे बहुतांश भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदीप दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही मनपा अधिकाऱयांचे दुर्लक्ष होत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप वारंवार बंद राहत आहेत. येथील पथदीप काही महिने सुरू ठेवण्यात आले, पण त्यानंतर बंद पडत असल्याने पुलावर अंधार पसरत आहे. याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर मनपाच्यावतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. केवळ दोन दिवस पथदीप सुरू ठेवल्यानंतर पुन्हा ते बंद पडल्याने उड्डाणपुलावर अंधार पसरला आहे. पुलावरून ये-जा करणाऱया नागरिकांना तसेच वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पादचाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
उड्डाणपुलावरील पथदिपांची देखभाल महापालिकेच्यावतीने करण्यात येते. सदर पथदिपांची देखभाल करण्याचे काम कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुरुस्ती करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन पथदीप सुरू करण्याची मागणी होत आहे.