अशोकराव पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी / कराड :
राज्यातील रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करून धान्य वितरण केले जाते. कार्डधारक पॉस मशिनवर आपले अंगठे लावत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बायोमेट्रीक पद्धत बंद करून दुकानदाराच्या अंगठ्याने धान्यवाटप करावे, अशी मागणी सातारा जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, बायोमेट्रीक पद्धतीमुळे संसर्ग वाढण्याची भीती दुकानदारांना व्यक्त केली आहे. हा प्रश्न केंद्र शासनाच्या अन्न पुरवठा खात्याकडे असल्याने जिल्हा व राज्य संघटनेतर्फे माजी खासदार गजानन बाबर व सर्व जिल्हय़ाचे जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत बायोमेट्रीक पद्धत बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी काही महिने अशी परवानगी देण्यात आली होती. यावर्षी वाढता संसर्ग पाहून या मागणीचा विचार होणे गरजेचे आहे. रेशन दुकानदारांना 50 लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळावे, ही मागणी प्रलंबित असून ती मंजूर करावी. जिल्ह्यात गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबर या महिन्यांच्या धान्य वाटपाचे कमिशन अद्याप दिलेले नाही, ते त्वरित द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.