बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत राज्यातील विविध विकासकाने, मंत्रिमंडळ विस्तार आणि पूरपरिस्थितीसह विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान महत्वाचा मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा आहे. येडियुरप्पा यांचा विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराचा मानस असला, तरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अन्य नेत्यांकडून त्यांना होकार मिळालेला नाही.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, नड्डा यांच्याशी त्यांची ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ चर्चा चालली. बैठकीत येडियुरप्पा यांनी केवळ मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रस्ताव ठेवला आणि सहा रिक्त जागांवर नेमणूक करण्यास परवानगी मागितली.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा यांनी, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून एक किंवा दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तारासाठी सूचना मिळतील.पक्षाध्यक्ष पंतप्रधानांशी याबाबत चर्चा करतील आणि आज काय तो निर्णय होईल. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तारात किती नेत्यांचा समावेश असेल, असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पक्षनेते काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. त्याच आधारे त्याचा विस्तार केला जाईल.
कॅबिनेट विस्तार किंवा फेरबदलाबाबत येडियुरप्पा यांना सोपे जाणार नाही. पक्षाचे अनेक जुने नेते त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर, कॉंग्रेस आणि जद (एस) मधून दाखल झालेले ए.एच. विश्वनाथ, आर.शंकर आणि टी.बी. नागराज हे नेतेही मंत्रिमंडळात येण्याची अपेक्षा करीत आहेत.