चिपळुणात कंपनी अध्यक्षासह दोघा संचालकांविरोधात गुन्हा : जिल्हय़ात 6 हजाराहून अधिक ग्राहकांची कोटय़वधीची फसवणूक
चिपळूण : जिल्हाभरातील सुमारे 6 हजाराहून अधिक ग्राहकांची कोटय़वधी रूपयांची फसवणूक करणाऱया कलकाम मायनिंग ऍण्ड लाजिस्टिक्स प्रा. लि. च्या अध्यक्षासह दोघा संचालकांविरोधात येथील पोलीस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात कंपनीने सुमारे 31 लाखाची फसवणूक झाल्याप्रकरणी एका तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून या कंपनीविरोधात तक्रारी असतानाच पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
कंपनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विष्णू पांडुरंग दळवी (47, व्हिनस गावंड बाग, पोखरण रोड-ठाणे), डेव्हलपमेंट डायरेक्टर सुनील रघुनाथ वांदे (39, सुविधा आपर्टमेंट, तुळीज, नालासोपारा), सिनिअर डेव्हलपमेंट डायरेक्टर विजय चंद्रकांत सुपेकर (46, वृंदावन गार्डन, पाथरीकेंड-महाड) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. तर या बाबतची फिर्याद संतोष दत्तात्रय भाटकर (46, वेळणेश्वर-वेदवाडी, गुहागर) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलकाम मायनिंग ऍण्ड लॉजिस्टिक्स प्रा. लि. या कंपनीच्या चिपळूण शाखेत संतोष भाटकर यांना 1 डिसेंबर 2016 ते 3 नोव्हेंबर 2020 या कालावधीपर्यंत कंपनीकडून पॉलिसीची मुदत संपल्यानंतरही मुद्दल रक्कम, प्लॉट एरिया, किंवा कंपनीतर्फे सर्टिफिकेटमधील 31 लाख 39 हजार 200 रुपये परताव्याची रक्कम त्यांना दिली गेली नाही. तसेच मुदत संपल्यानंतरचे व्याज, इतर कोणत्याही लाभाचा फायदा व अन्य स्वरुपातील कोणत्याही लाभासह ठेवीची कोणतीही परतफेड त्यांना दिली गेली नाही. यातूनच त्यांची 31 लाख 39 हजार 200 इतक्या रक्कमेची फसवणूक झाली आहे. या बाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
कलकाम मायनिंग ऍण्ड लाजिस्टिक्स प्रा. लि. च्या ग्राहक आणि एजंटानी काही दिवसांपूर्वीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत कंपनीविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. कलकाम नावाने या कंपनीची 24 डिसेंबर 2004 साली स्थापना झाली. ग्राहकांना विश्वास बसावा, यासाठी कंपनीने व्यवसाय म्हणून दोडामार्ग येथील 2 मायनिंग प्रोजेक्ट, कलपार्क हॉटेल तसेच दोडामार्ग, कुडाळ व सावंतवाडी येथील शेकडो एकर जमीन, ट्रान्स्पोर्टसाठी लागणारे डंपर, स्वमालकीची कार्यालये दाखवली होती. सुरुवातीच्या काळात ग्राहकांच्या परताव्याची रक्कम योग्य वेळेत दिली गेली. त्यानंतर मात्र ग्राहकांच्या मुदत संपलेल्या रक्कमेचा परतावा देण्यास कंपनीने टाळाटाळ केली. अनेकदा कंपनी अध्यक्षासह संचालकांशी संपर्क साधूनही पुढे त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद ग्राहकांना मिळाला नसल्याने यातूनच त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
जिल्हाभरात 6 हजार ग्राहकांची फसवणूक
काही दिवसांपूर्वी कलकामने केलेल्या फसवणुकीचा प्रकार ग्राहकांनी पोलीस स्थानकात नेला होता. त्यातूनच पोलिसांनी तक्रारी देण्याचे आवाहनही केले होते. जिल्हाभरात कलकामने अनेकांना चुना लावला असून जवळपास 6 हजाराहून अधिक जणांची 30 कोटी इतकी रक्कम कंपनीकडून परतावा स्वरूपात येणे आहे. जिह्यात इतक्या मोठय़ा रक्कमेची फसवणूक असताना पहिली तक्रार येथे दाखल झाली असून त्यानुसार चिपळूण पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीच्या प्रकारानंतर या तिघांनी यापूर्वीच जिह्यातून पळ काढला.