महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेशातील अनेक चोऱयात सहभाग
प्रतिनिधी /म्हापसा
रत्नागिरी येथे चार दुकाने फोडून गोव्यात पसार झालेल्या चार जणांच्या उत्तर प्रदेशमधील आंतरराज्य टोळीला कळंगुट पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र, गोवा व उत्तर प्रदेश मधील अनेक चोऱयांच्या प्रकरणात या टोळीचा हात असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
संशयित एम. डी. सोफीयान, फिरोज आलम, एम. डी. अझरुद्दीन व फैझान अली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते मुळ कानपूर उत्तर प्रदेशमधील असून सध्या गवंडी तिलकनगर मुंबई येथे वास्तव्यास होते. रत्नागिरी शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास चार दुकाने फोडण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील चोरटे गोव्यात पसार झाल्याचे रत्नागिरी शहर पोलिसांनी गोवा पोलीसांना कळवले होते. तिघे संशयित कळंगुट समुद्रकिनारी फेरफटका मारताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी पकडले तर एकाला हॉटेलच्या खोलीवरून पकडून
अटक केली. निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विद्या आमोणकर, शिपाई महेंद्र च्यारी, रुपेश च्यारी, रुपेश साळगावकर, समीतल बांदेकर, प्रितेश किनळेकर, गणपत तिळोजी, विजय नाईक यांनी ही कारवाई केली.