सिंधुदुर्ग/प्रतिनिधी
कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या कणकवली–वागदे गोपुरी आश्रमच्या वाचन संस्कृती विकास उपक्रमातर्फे कवी अजय कांडर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील लोकवाड.मय गृह (मुंबई) प्रकाशनने प्रकाशित केलेल्या बहुचर्चित ‘युगानुयुगे तूच‘ या दीर्घ कवितासंग्रहावर तरुणाईच्या सहभागाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (दि.2 फेब्रुवारी) रोजी सकाळी नऊ वाजता गोपुरी आश्रमच्या गणपत सावंत सभागृहात हे चर्चासत्र पार पडणार आहे.
तरुणाईमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होत जावी या हेतूने गोपुरी आश्रमातर्फे गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर आणि संचालिका अर्पिता मुंबरकर यांच्या संकल्पनेतून तरूणाईच्या सहभागाने दर महिन्याला वाचन संस्कृती विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात दर महिन्याला तरुण–तरुणी आपण वाचलेल्या पुस्तकावर आपली विविध मते मांडतात. तर वाचलेल्या ग्रंथातील आवडलेल्या गोष्टी कथन करून पुस्तकाच्या लेखनावर सडेतोड मांडणीही करतात. त्याच बरोबर मराठी साहित्यात बहुचर्चित असलेल्या एखाद्या ग्रंथावर स्वतंत्र चर्चासत्र आयोजित केले जाते. कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या बहुचर्चित ठरलेल्या ‘इंडियन ॲनिमल फार्म‘ या कादंबरीवर या उपक्रमात तरुणाईचे आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र लक्षवेधी ठरले होते. त्यानंतर कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच‘ या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘युगानुयुगे तूच‘ या दीर्घ कवितेवर हे तरुणाईचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात वाचन संस्कृती विकास ग्रुपचे दहा तरुण वाचक ‘युगानुयुगे तूच‘ कवितासंग्रहावर बोलणार असून यात सिद्धी वरवडेकर, पल्लवी कोकणी, अंकिता सावंत, अमित राऊळ, चिंतामणी सामंत, सोनल भिसे, शैलेश कदम, तेजश्री आचरेकर, अंकिता सामंत आणि सिमरन हरमलकर आदींचा सहभाग आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अगदी सहज समजून घेणारा कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच‘ हा दीर्घ काव्यसंग्रह माणूस म्हणून घेणाऱ्या प्रत्येक माणसाने समजून घेतल्यास भविष्यातील समतेच्या, माणसातील माणूसपणाच्या वाटा अधिकच रुंद होत जातील. याच पार्श्वभूमीवर युवकांच्या सहभागाने या चर्चेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रा.डॉ. मुबंरकर यांनी स्पष्ट केले. तर साहित्य रसिकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहनही केले आहे.