प्रतिनिधी / खेड
गेल्या दोन दिवसांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. कशेडी चेकपोस्टवर वाहनांची कडक तपासणी करण्यात येत असून ई-पास असणाऱ्या वाहनांनाच कोकणात प्रवेश दिला जात आहे. मंगळवारी मुंबईहून विनापास कोकणात येणाऱ्या ५० वाहनांना कशेडी चेकपोस्टवरून माघारी धाडण्यात आले.
कोकणात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली लागू केली असून नियमांचे पालन करुनच कोकणात येण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, काहीजण ई-पास न काढताच मुंबईतून कोकणात येण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय काही वाहनचालक बोगस पास घेवून कोकणात येण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कशेडी चेकपोस्टवर येथे प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यासाठी ज्यादा पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. वाहनांच्या तपासणीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहनचालकांचे चांगलेच हाल होत आहेत.