विधानसभेत शुक्रवारीही चर्चा नाहीच : विरोधी पक्षाकडून धरणे सुरूच : कामकाज सोमवारी दुपारपर्यंत लांबणीवर
प्रतिनिधी / बेंगळूर
गुरुवारपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी देखील विरोधी पक्ष काँग्रेसने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावरील चर्चेला विरोध दर्शविला. काँग्रेस आमदारांनी दुसऱया दिवशीही विधानसभेत धरणे आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे सभागृहात चर्चा झालीच नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून समर्थन तर विरोधी पक्षाच्या आमदारांचा तीव्र विरोध, यामुळे विधानसभेत गदारोळ माजला. परिणामी, सभागृहाचे कामकाज दोनवेळा पुढे ढकलण्यात आले. मात्र, काँग्रेस आमदारांनी एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेविरोधात असणारी भूमिका कायम ठेवल्याने सभाध्यक्षांनी कामकाज सोमवारी दुपारी 12 पर्यंत लांबणीवर टाकले.
सोमवारी राज्याचा 2021-22 या सालातील अर्थसंकल्प सादर होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवसांचे कामकाज एक राष्ट्र, एक निवडणूक या विषयावर चर्चेसाठी राखून ठेवण्यात आले होते. मात्र, गुरुवारप्रमाणेच शुक्रवारी देखील काँग्रेस आमदारांनी धरणे आंदोलन सुरूच ठेवल्याने अधिवेशनाच्या दुसऱया दिवसाचे कामकाज व्यर्थ गेले. विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे भाषण वगळता सभागृहात कोणालाही आपले मत मांडता आले नाही. गृहमंत्री बसवराज बोम्माई बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेऊन धरणे आंदोलन सुरू केले. त्यामुळे बोम्माई यांना आपले मत मांडता आले नाही.
सभाध्यक्षांची विनंती; तरीही आंदोलन सुरूच
शुक्रवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. सभाध्यक्ष कागेरी यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तरी काँग्रेस आमदारांनी दाद दिली नाही. त्यामुळे सभाध्यक्षांनी कामकाज अर्धा तास पुढे ढकलले. दुपारी 12.20 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले. त्यावेळीही काँग्रेस आमदारांनी धरणे सुरूच ठेवले. यावेळी सभाध्यक्षांनी एक राष्ट्र, एक निवडणूक या विषयावर बोलण्याची संधी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांना दिली. मात्र, सभागृहातील गदारोळामुळे बोम्माई यांचे बोलणे कोणालाच समजत नव्हते. त्यावेळी धरणे आंदोलन मागे घेऊन इतरांना बोलण्याची संधी द्या, अशी विनंती सभाध्यक्षांनी केली. त्यावेळीही काँग्रेस आमदार भूमिकेवर ठाम असल्याने सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी विरोधी पक्षाच्या आमदारांवर टिकांचा भडिमार केला. यावेळीही गदारोळ माजल्याने सभाध्यक्षांनी दुसऱयांदा कामकाज दुपारी 3.30 पर्यंत लांबणीवर टाकले.