मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा दिल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले आहेत. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. आम्ही स्वबळावर जेवायला येऊ, असा टोला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली असून टोला लगावला आहे. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जलभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी आघाडीचे मंत्री उपस्थित होते. यावेळी अजित पवारांचं भाषण झालं. या भाषणात पवारांनी जेवणाचा विषय काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या भाषणातील जेवणाचा धागा पकडून जोरदार बॅटिंग केली. दादा तुम्ही जेवणाचा विषय काढला. थोरात साहेब म्हणाले कोरोनामुळे जमलं नाही. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. कोरोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना काढताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच सारवासारव केली.
स्वबळाचा अर्थ असा नका समजू. म्हणजे आम्ही न भिता जेवायला येऊ. नाही तर उद्या जेवणावरून आघाडीत बिघाडी असं काही छापून यायचं, असं काही नाही. हा गंमतीचा भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.