सलमान खुर्शीद यांच्याकडून सिब्बल, चिदंबरम लक्ष्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणुकीत गचाळ कामगिरी करणाऱया काँग्रेसच्या काही नेत्यांनी सर्वोच्च नेतृत्वावर टीका केली होती. या टीकेनंतर पक्षात आता दोन गट पडले आहेत. पक्षात नेतृत्वाचे कुठलेच संकट नाही. सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकरता पक्षातील पूर्ण सहकार्य नेत्रहीन वगळता प्रत्येक जण पाहू शकतो, असे म्हणत सलमान खुर्शीद यांनी कपिल सिब्बल आणि पी. चिदंबरम यांना लक्ष्य केले आहे.
काँग्रेसमध्ये मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध आहे. परंतु पक्षाबाहेर मत मांडण्यात आल्याने केवळ नुकसानच होत असल्याचे खुर्शीद म्हणाले. कपिल सिब्बल आणि काही अन्य नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर उघडपणे टीका केली आहे.
पक्ष नेतृत्व माझे म्हणणे ऐकून घेते, माझ्यासह सगळय़ांनाच म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे. पक्षनेतृत्व म्हणणं ऐकून घेत नसल्याची बाब नेमकी कुठून आली असे प्रश्नार्थक विधान खुर्शीद यांनी केले आहे. बिहार निवडणुकीसंबंधीही विश्लेषण करण्यात येणार आहे. कुठे चूक झाली, कशाप्रकारे सुधारणा करू शकतो याची समीक्षा नेतृत्व करणार असल्याचे खुर्शीद म्हणाले.
योग्य कारणांमुळे…विलंब
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांना वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. नव्या अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेत विलंब होत असेल तर यामागे समर्पक कारण असेल. बसप, डाव्या पक्षांमध्ये कुणीच अध्यक्ष नाही, केवळ महासचिव आहे, प्रत्येक पक्ष एकच प्रारुप अवलंबू शकत नाही. काँग्रेसकडे सोनिया गांधींच्या स्वरुपात एक अध्यक्षा आहेत, असे खुर्शीद म्हणाले.