वार्ताहर/ निपाणी
निपाणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक निवडणुकीत येणारा पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीला कारण ठरत होता. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून म्हणावे तसे पाठबळ मिळत नसल्याने कार्यकर्त्यांतून चिंता व्यक्त होत होती. अशा परिस्थितीत युवा नेते उत्तम पाटील यांनी काँग्रेस नेतृत्त्वाची जबाबदारी स्वीकारत कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोलाचे सहकार्य केले. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहेर आली असून सर्वजण पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.
निपाणी विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्षे काँग्रेस पक्षाने राज्य केले. सर्वच विभागांवर आपली सत्ता गाजवून कार्यकर्त्यांना संधी दिली. मध्यंतरीच्या काळात जनता दलानेही काही वर्षे आपली सत्ता निर्माण केली. पण, भाजपला अनेक वर्षे प्रयत्न करूनही सत्ता केंद्रे आपल्याकडे घेता आली नाहीत. मात्र, सन 2013 च्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. या माध्यमातून सत्ताकेंद्र हाती घेताना आता जवळपास सर्वच सत्ताकेंद्रे काबीज केली आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली होती.
मतदारसंघातील सत्ताकेंद्र स्थापन करण्याचा पाया मजबूत करण्याचे प्रमुख माध्यम म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच भाजपबरोबरच काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली. ही तयारी करताना सत्ताकेंद्रे अधिक असणाऱया भाजपने साहजिकच आघाडी घेतली. यातून काहीसा नाराजीचा सूर काँग्रेस कार्यकर्त्यांतून व्यक्त होऊ लागला. पुरस्कृत आघाडी निर्माण केल्यावर नेतेमंडळी कितपत पाठबळ देतील याचीही चर्चा सुरू झाली.
काँग्रेस पक्षाने हीच संधी लक्षात घेऊन निपाणीत नेतेमंडळींच्या उपस्थितीत मेळावा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये विरोधकांशी लढण्याची ऊर्जा दिली. गावागावात पॅनेल उभे राहिले. प्रचारालाही सुरुवात झाली. पण, आवश्यक पाठबळ मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या. यातच काँग्रेसचे युवा नेते उत्तम पाटील पुढे आले व काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठबळ देत लढण्याचे बळ दिले.
उत्तम पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने घेतलेला पुढाकार काँग्रेस पुरस्कृत आघाडीचे उमेदवार आणि स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मरगळ दूर करण्यास पूरक ठरला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हीच संधी साधत प्रचारात आघाडी घेतली. मतदारांना आपलंस करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. उत्तम पाटील यांनी गावोगावी जाताना संपूर्ण मतदारसंघ पालथा घातला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहेर निर्माण झाली.
युवा नेते उत्तम पाटील यांनी निपाणी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला संजीवनी दिल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उत्तम पाटील यांच्या पुढाकाराचे फलित मिळणार आहेच पण, त्याचबरोबर येत्या काळात काँग्रेसला मतदारसंघात नव्या संधी मिळताना विविध पातळीवर सत्ता काबीज करता येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. यासाठी युवा नेते उत्तम पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच येणाऱया काळात सक्रिय रहावे, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.