वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात कोरोना संक्रमणाच्या संभाव्य तिसऱया लाटेदरम्यान वेगाने लसीकरणाचे काम सुरू आहे. देशात आतापर्यंत 50 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱया या मोहिमेचे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी कौतुक केले आहे. कोविन ऍपचे प्रारंभी टीकाकार राहिलेल्या थरूर यांनी आता या ऍपची प्रशंसा केली आहे.
केंद्र सरकारच्या चांगल्या कामांची मी नेहमीच प्रशंसा करतो. सरकारच्या कोविन ऍपचा मी टीकाकार राहिलो आहे. पण या ऍपने निश्चितपणे काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. या ऍपद्वारे लोकांना स्वतःचे लसीकरण प्रमाणपत्र मिळू शकते. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान असल्याचे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच भारताने 50 कोटी लोकांना लस देण्याचा टप्पा गाठला आहे. या विशेष कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना महामारीच्या विरोधात भारताच्या लढाईने नवी उंची गाठल्याचे म्हटले आहे.