प्रतिनिधी/ मडगाव
काँग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्यात काल शनिवारी युती झाली. ही युती गोव्यासाठी भविष्यात त्रासदायक ठरणार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. आशिष कामत यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत चांगली संधी होती. मात्र, ज्या पक्षाकडे त्यांनी युती केली, त्यातून काँग्रेस पक्षाला फटका बसणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस पक्षाने, गोवा फॉरवर्डकडे युती केल्याने प्रवक्ते डॉ. आशिष कामत, काँग्रेसच्या आरटीआय विभागाचे प्रमुख डॉमनिक नोरोन्हा, चार्ली डिसिल्वा व अनुप बोरकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षच गोव्याला चांगले प्रशासन देऊ शकतो, या हेतूने आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, जे जमीनीची दलाली करण्यात गुंतलेले आहेत. त्यांच्याकडे युती करून स्वतालाच अडचणीत आणून ठेवलेले आहे असे आशिष कामत म्हणाले.
भाजपचे सरकार सत्तेवर आणले विजयने
2017 निवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला नव्हता. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थित सुद्धा विजय सरदेसाई यांनी भाजपला पाठिंबा देऊन गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आणले. त्या सरकारात ते मंत्री झाले. या सरकारात असताना त्यांनी जे कार्य केले, त्यातून ‘16 बी’ आणि प्रादेशिक आराखडा कार्यरत केला. बाहय़ विकास आराखडय़ातून त्यांनी शहरे उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. जंगली जागाचे रूपांतर करून बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप डॉ. कामत यांनी यावेळी केला.
काँग्रेस पक्ष गेल्या वर्षभरापूर्वी या बेकायदेशीर गोष्टींना विरोध करीत होता, आज त्यांच्याशी हात मिळवणी करून गोव्याला त्रासात टाकण्याचे पाऊल मारले असल्याचे डॉ. कामत म्हणाले. गोव्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसला सर्वाधिक जागा प्राप्त करून सत्तेवर येण्याची हीच चांगली संधी होती. मात्र, त्यांनी ही संधी आत्ता गमावली असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षावर आम्ही टीका करीत नाही तर येथील स्थानिक नेते जो गोंधळ घालत आहे. त्यात त्यांचा स्वार्थ असल्याने, पक्षाला ठेच बसू लागली. पक्षाकडे भक्कम नेतृत्व नसल्याने पक्षाची वाताहात असल्याचे काल पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे डॉ. कामत म्हणाले.
आरटीआय प्रमुख डॉमनिक नोरोन्हा म्हणाले की, आपल्यावर जी जबाबदारी दिली होती. त्या जबाबदारीतून काम करण्याची संधी कधीच पक्षाच्या नेतृत्वाने दिली नाही. पक्ष मजबूत करण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाही हे सत्य आहे. पक्षाचे गोवा प्रभारी पी. चिदंबरम यांनी गट समित्यांचा निर्णय हा अंतिम असेल असे सांगितले होते. मात्र, तसे कुठे होताना दिसत नाही. जर गट समित्यांचा निर्णय अंतिम मानला असता तर काल गोवा फॉरवर्डकडे युती झालीच नसती. फातोर्डा गट समितीला किती महत्व पक्षाने दिले हे देखील स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या झरिना डिकुन्हा उपस्थित होत्या. त्यांनी दिगंबर कामत व रमाकांत खलप यांच्यावर जोरदार टीका केली. या नेत्यांनी पक्षाच्या हिताचा विचार केलेला नाही. जर केला असता तर काल गोवा फॉरवर्डकडे युती झाली नसती अशा त्या म्हणाल्या.