राज्यात भाजपचीच सत्ता येईल
प्रतिनिधी /पणजी
विधानसभेसाठी विक्रमी मतदान झाल्याने लोकांनी काँग्रेसला मते दिली असून भाजपा एकेरी संख्याही गाठणार नाही, असे ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले आहे. मात्र हा दिवास्वप्ने पाहण्यासारखा प्रकार असून राज्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला आहे.
काँग्रेस नेते दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर यांना हल्ली वायफळ बडबड करण्याची सवय लागली आहे. राज्यात चांगले मतदान झाले म्हणजे ते भाजप विरोधात झाले, असा जावईशोध त्यांनी लावला आहे. येत्या 10 मार्च रोजी निकाल लागल्यानंतर ’कौन जीता, कौन हारा’ ते कळून येईल, अशी टीका तानावडे यांनी केली आहे.
राज्यात नुकतेच मतदान झाले आहे. निकाल लागण्यास अजून महिनाभर आहे. तरीही आतापासूनच काँग्रेसला सत्तेच्या खुर्चीची हाव लागली आहे. मतदारांनी कोणाच्या पारडय़ात दान टाकले आहे, याची प्रतीक्षा करण्याचीही त्यांची तयारी नाही. अर्थात, ’आपला पक्ष जिंकेल’ असा दावा करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु ’भाजपला एकेरी संख्याही गाठता येणार नाही’, यासारख्या भंपक गोष्टी त्यांनी बोलू नयेत, असा सल्ला तानावडे यांनी दिला आहे.
काँग्रेसचा भ्रष्टाचार, भाजपचा विकास लोकांनी पाहिला आहे
भाजपचा जनतेवर पूर्ण विश्वास असून गेल्या दहा वर्षांत देशात आणि राज्यात केलेला विकास लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर संधी मिळूनही काँग्रेसने राज्याची वाट लावल्याचे गोमंतकीय जनतेला माहीत आहे. काँग्रेसचे घोटाळे आणि भ्रष्टाचार लोकांनी पहिला आहे. त्यामुळे पुढील सत्ता काँग्रेसची येईल, अशी दिवास्वप्ने पाहणे त्यांनी सोडून द्यावे, असे तानावडे यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने भाजपची चिंता करू नये
भाजपचे सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गेले वर्षभर अखंड मेहनत घेत होते. निवडणुकीची तयारी पूर्वीपासून सुरू होती. दुसऱया बाजूने चोडणकर यांच्या कार्यशैलीस कंटाळून काँग्रेसचे वरि÷ नेते पक्ष सोडून जात होते. त्यामुळे चोडणकर यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, आमची चिंता करू नये, असा सल्ला श्री. तानावडे यांनी दिला आहे. या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल, यात तिळमात्र शंका नाही. 10 मार्चपर्यंत कामत आणि चोडणकर यांनी हव्या तेवढय़ा शाब्दिक गमजा माराव्यात, असेही तानावडे यांनी म्हटले आहे.