प्रतिनिधी / कागल
कागल तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या शाखा आहेत त्या त्या ठिकाणी व्यसनमुक्ती झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही या शाखांचा चांगला आधार आहे. ब्रह्मकुमारी सेंटर ज्या ठिकाणी शाखांसाठी जागा मागेल त्या ठिकाणी ती देऊ. कागलच्या नवीन जागेत ब्रह्माकुमारी चे चांगले सेंटर बनवू. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
र्ं कागलच्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यामध्ये, ब्रम्हा बाबांच्या 151 व्या स्मृति दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. याप्रसंगी भैय्या माने, सतिश घाडगे, चंद्रकांत गवळी,रमेश माळी, नितीन दिंडे, अशोक जकाते, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुश्रीफ यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेंटरच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, जगात परमेश्वर आहे ,नाही माहित नाही परंतु जगामध्ये एक अशी अदृश्य शक्ती आहे. त्या शक्तीला आपण परमेश्वर मानतो. विविध धर्मांमध्ये त्याला वेगवेगळी नावे आहेत. प्रत्येक धर्मामध्ये सत्य बोला, असत्य बोलू नका, वाईट चिंतू नका,शत्रृत्व करु नका. परोपकारी रहा, एकमेकांना सहकार्य करा असाच संदेश दिला आहे. त्याप्रमाणेच मी आयुष्यभर गोरगरिब लोकांची सेवाच करत आलो आहे. त्यांना वेळोवेळी मदत करणे हेच काम केले आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझे कोणीच काही करू शकत नाही. ते म्हणाले कागलच्या ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सेंटरला कायम मदत केली आहे. पालिकेने या सेंटरला पाच एकर जागा दिली आहे. त्या जागेवर एक चांगले ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाचे सेंटर करू. तसेच ज्या ठिकाणी सेंटरच्या शाखेसाठी जागा हवी असेल त्या ठिकाणी जागा देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. .
याप्रसंगी राजश्रीबहेनजी आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या सर्व धर्मांमध्ये परमेश्वराची विविध रूपे आहेत. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वरी सेवा आहे. आज जगाच्या 144 देशांमध्ये ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचे कार्य सुरू आहे. कागलच्या सेंटरचा पाया मंत्री मुश्रीफ यांनीच घातला आहे. त्यांनी तालुक्यातील अनेक ब्रह्मकुमारी यांच्या शाखांना मदत केली आहे. आज त्यांच्याकडून गोरगरिबांसाठी मोठे काम होतच असते परंतु भविष्यातही त्यांच्याकडून चांगले समाज कल्याण व्हावे.असे त्यांनी सांगितले. स्वागत स्नेहल बहेनजी यांनी केले. कार्यक्रमास संजय चितारी, इरफान मुजावर, सुभाष भाई, प्रकाश माळी, महादेव भाई, गणेश भाई, अनिता बहेनजी ,सुवर्ण बहेनजी, प्रियांका बहेनजी, संध्या बहेनजी, यांच्यासह या सेंटरचे उपासक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.