चावडीवरील मासळी मार्केटचा परिसर जलमय
प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात 16 रोजी दिवसभर पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळित करून सोडले असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दिवसभर चालू राहिलेल्या संततधारेमुळे चावडीवरील बाजारावर परिणाम झाला. लोकांनी घरातच राहणे पसंत केले. काही ठिकाणची रस्त्याच्या बाजूची गटारे उपसण्यात न आल्यामुळे रस्त्यावर पाणी येण्याचे प्रकार घडले, तर चावडीवरील मासळी मार्केट परिसर पूर्णपणे जलमय झाला.
पालिका इमारतीसमोर सर्वत्र पाणी साचले असून पालिका सभागृहाच्या इमारतीमध्ये असलेल्या दुकानांत त्याचप्रमाणे मासळी मार्केटमध्ये पाणी शिरले आहे. पाण्याच्या पारंपरिक वाटा बंद करण्यात आल्याचा हा परिणाम असून पालिका इमारतीच्या समोर हा प्रकार घडला असताना सुद्धा काणकोण पालिकेचे प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याच्या प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चावडीवरील स्टेट बँक परिसर, मामलेदार कार्यालयाजवळच्या भागात पाणी साचले आहे. चार रस्ता येथे बगलमार्गाखालून जेथे रस्ता जातो त्या परिसरात तसेच गालजीबाग, तळपण येथील बुजविण्यात आलेल्या शेतजमिनीतील पाण्याच्या वाटा बंद झाल्यामुळे त्या भागांमध्ये देखील पाणी साचले आहे. गालजीबाग, तळपण नद्यांची पातळी वाढली आहे. कित्येक ठिकाणचे ओढे भरून वाहायला लागले आहेत. मात्र कुठेच गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याची नोंद नाही.