17 फेब्रुवारी रोजी साजरा व्हायचा दिवस, स्वातंत्र्यसेनानी डॉ. पुंडलिक गायतोंडे यांना पोर्तुगीज शासनाने केली होती अटक, सत्याग्रहींनी केला होता निषेध
प्रतिनिधी /काणकोण
साडेचारशे वर्षे पोर्तुगीज राजवटीत राहिलेल्या गोव्याला मुक्त करण्यासाठी गोमंतकीय युवकांमध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांनी जशी क्रांतीची ज्योत पेटविली त्याचप्रमाणे काणकोणच्या तत्कालीन युवकांना जागरूक करण्याचे काम केलेले डॉ. पुंडलिक गायतोंडे यांचे कार्य देखील तेवढेच मोलाचे असे आहे. मात्र आजची पिढी, सरकारी यंत्रणा, काणकोणची जनता या महान सत्याग्रहीला हळूहळू विसरायला लागली आहे.
त्यांच्या कार्याची आठवण सतत नव्या पिढीसमोर राहावी यासाठी त्यांचे बंधू नंदा गायतोंडे यांनी 17 फेब्रुवारी हा दिवस गायतोंडे दिन म्हणून पाळण्यात यावा यासाठी खटाटोप केला. पाळोळे येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी काही वर्षे हा कार्यक्रम सातत्याने चालला. मात्र ही गुढी पुढे घेऊन जाणारी पिढी पुढे आली नाही आणि गोवा मुक्तीलढय़ात सहभागी झालेले हे व्यक्तिमत्व आता विस्मृतीकडे जायला लागले आहे.
डॉ. पुंडलिक गायतोंडे हे मूळ पाळोळे, काणकोणचे. ते एक नामांकित सर्जन होते आणि पोर्तुगीज काळात म्हापसा येथे काम करत होते. कर्करोगावर ते संशोधन करत होते. मुळातच राष्ट्रीय प्रवृत्तीच्या असलेल्या डॉक्टरांनी वैद्यकीय परीक्षा पोर्तुगालमध्ये दिली आणि गोव्यात आल्याबरोबर नॅशनल काँग्रेस, गोवाचे कार्य सुरू केले. पणजीतील एका हॉटेलमध्ये 14 फेब्ा्रgवारी, 1954 रोजी न्यायाधीश सेमेदु या पोर्तुगीज अधिकाऱयाला पोर्तुगालला परत पाठविण्यासाठी निरोप समांरभ व खाना ठेवण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला डॉक्टर या नात्याने गायतोंडे उपस्थित होते.
निरोप समारंभात केला विरोध
यावेळी डॉ. कुलासो यानी आपल्या निरोपाच्या भाषणात गोवा हा पोर्तुगालचा एक भाग आहे किंबहुना तो पोर्तुगालच आहे, असे वक्तव्य केले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉ. पुंडलिक गायतोंडे यांनी कशाचाही विचार न करता ‘मी विरोध करतो’ असे ताडकन म्हटले आणि या दोन शब्दांनी इतिहास घडविला. त्याच क्षणी डॉ. गायतोंडे यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या पत्नीसहित पोर्तुगालला रवानगी करण्यात आली. ते राष्ट्रवादी असून पोर्तुगीजविरोधी आहेत असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर जुलै, 1954 मध्ये त्यांच्यावर लिस्बन येथे खटला भरून तीन महिने कारावास, बारा वर्षे नागरिक हक्क बंदी अशी शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली. तसेच पाच वर्षे पॅरोल काळात पोर्तुगालबाहेर न जाण्याची अट घालण्यात आली.
सत्याग्रहींनी केला निषेध
वरील दिवस गायतोंडे दिन म्हणून पाळण्याचा निर्णय त्यावेळच्या सत्याग्रही युवकांनी घेतला आणि 17 फेब्रुवारी, 1955 रोजी लोलये येथील मुकुंद गंगाराम लोलयेकर यांच्या नेतृत्वाखाली 14 युवकांनी काणकोण येथे सत्याग्रह केला. त्यात गावडोंगरी, थाळणी, लोलये, पैंगीण येथील कृष्णा पी. देसाई, बालाजी देसाई, जयवंत लोलयेकर, जिवा भागडू गावकर, चंद्रकांत वेळीप, भिसो वेळीप, नागेश अंता देसाई, रामदास लोलयेकर, रंगनाथ सुदिर, विष्णू घाटू पागी, विश्वंभर लोलयेकर, सुबा देवळी या युवकांनी सत्याग्रह केला. त्यावेळी हा अमूक जातीचा, तो तमूक जातीचा याचा विचार कोणीही केला नाही. एवढेच नव्हे, गंगाधर लोलयेकर यांनी मडगावला, तर विलासिनी प्रभू महाले या युवतीने आपल्या जिवाची तमा न बाळगता डॉ. पुंडलिक गायतोंडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ सत्याग्रह केला होता.
गोवा मुक्तीनंतर डॉ. पुंडलिक गायतोंडे यांची सुटका झाली. त्यानंतर काणकोणच्या स्वातंत्र्यसैनिकांनी या सत्याग्रहाची आठवण म्हणून दरवर्षी 17 फेबुवारी हा दिवस गायतोंडे दिन म्हणून पाळतानाच त्यात शालेय, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामावून घेतले होते. या सत्याग्रहाची आणि त्यात भाग घेतलेल्या त्या वेळच्या युवकांची स्मृती सतत आजच्या युवकांमध्ये राहावी या हेतूने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जायचा. याच प्रेरणेतून तत्कालीन आमदार स्व. संजय बांदेकर यांच्या कारकिर्दीत चावडीवर उभारलेल्या मैदानाला गायतोंडे मैदान असे नाव देण्यात आले, तर पाळोळे येथील रस्त्याचे काणकोण पालिकेने गायतोंडे रस्ता असे नामकरण केले. गोवा आपल्या मुक्तीचे 60 वे वर्ष साजरे करत असताना पोर्तुगीज सरकारात नोकरी करत असताना सुद्धा पोर्तुगीजांच्या विरुद्ध ज्यांनी आवाज उठविला त्या डॉ. पुंडलिक गायतोंडे यांचे स्मरण आजच्या पिढीला करून देण्याची गरज निर्माण व्हायला लागली आहे.