ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अफगाणिस्तानात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी वेगवेगळय़ा पक्षाच्या नेत्यांना अफगाणिस्तानमधील परिस्थितीची माहिती दिली. सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती ही गंभीर असल्याचे म्हटले. भारत सरकारचे अफगाणीस्तानमध्ये फसलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत 6 उड्डाणे केली असून बहुतांशी भारतीयांना परत आणले आहे. आम्ही यावेळी काही अफगाण नागरिकांनाही बाहेर काढले आहे.
पुढे ते म्हणाले, आतापर्यंत 15 हजार लोकांनी भारतातील हेल्प डेस्कशी संपर्क केला. अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रपती घनी यांनी देश सोडल्यानंतर लष्कराने शरणागती पत्करली. तालिबानसोबत चर्चा करण्याबाबत सरकारने म्हटले की, भारत आणि जगाने सध्या वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे. अजुन चीन, रशिया, अमेरिकेनेसुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.
या सर्वपक्षीय बैठकीत सरकारतर्फे 6 मंत्र्यांनी भाग घेतला. त्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, वाणिज्य मंत्री पियूष गोयल, तसेच केंद्रीय मुरलीधरण आणि अर्जुन मेघवाल सहभागी झाले होते.