वकिलांनी विरोध करताच वाहनांचे लिलाव रद्द
प्रतिनिधी/ बेळगाव
विविध प्रकरणी जप्त करण्यात आलेली दुचाकी वाहने न्यायालयाच्या आवारात लिलाव करण्याबाबत गुरुवारी हालचाली सुरू होत्या. मात्र, त्याला काही वकिलांनी विरोध केल्यामुळे ही लिलाव प्रक्रिया बंद झाली. कोरोना आहे म्हणून न्यायालयीन कामकाज करताना अधिक दक्षता घेण्यात येत आहे. असे असताना दुचाकींचा लिलाव करणे योग्य आहे का? याबद्दल वकिलांनीच तक्रार केल्यानंतर ते काम थांबले आहे.
कोरोना आहे म्हणून न्यायालयीन कामकाज अत्यंत संथगतीने सुरू आहे. कोरोना रॅपीड टेस्ट करूनच प्रत्येकाला आत सोडण्यात येत आहे. न्यायाधीश अत्यंत सुरक्षित राहत आहेत. असे असताना अचानक त्या वाहनांचा लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. न्यायालयाच्या आवारात ती जुनी वाहने उभी करण्यात आली. त्यामुळे लिलावात भाग घेणाऱयांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. काही वकिलांनी याबद्दल तक्रार करताच लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली. न्यायालयीन कामकाज ठप्प असताना वाहनांचा लिलाव करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भर उन्हात पक्षकार न्यायालयाच्या आवारासमोर ताटकळत दिवसभर थांबत आहेत. त्यांच्याबद्दल कोणतीच सहानुभूती नाही. मात्र लिलावात भाग घेण्यासाठी अनेकांना सोडण्यात आले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.