आपल्या हक्काच्या मराठी मतदाराकडेही दुर्लक्ष करून महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेश, बिहारच्या कामगारांना त्यांच्या त्यांच्या गावी सुखरूप पाठविण्यासाठी प्रयत्न केले. राहत्या ठिकाणापासून एसटी, रेल्वे, खायला डबे, प्यायला बाटलीबंद पाणी दिले. सरकारी पाहुण्यांनी रेल्वे स्थानकांवर निरोप दिला. साडेसात लाख कामगार आपापल्या गावी सहकुटुंब सुखरूप पोहोचले आणि नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कंठ फुटला. महाराष्ट्र आपल्या रक्ताने आणि घामाने चालविलेल्या कामगारांना कर्मभूमीतून पळवून लावले, छळले. मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्याशी अमानवी वागले, यापुढे कोणत्याही राज्याला आमचे कामगार हवे असतील तर रीतसर नोंदणी करून न्यावी वगैरे वगैरे बरेच काही योगी बोलले. हे तेच योगी आहेत, ज्यांच्या राज्यात शंभर मुले फुकापासरी मेली तर वाचविणाऱया डॉक्टरलाच त्यांनी आरोपी बनवले. शोक करून प्रश्न करणाऱया पालकांना ‘ये नौटंकी बंद करो’ असे अमानवीपणे सांगितले. त्यांच्या तोंडी आता मानवतेची मौक्तिके! उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडूपासून अगदी पश्चिम बंगालपर्यंत देशाच्या कानाकोपऱयातून लोक मुंबईत येतात. त्या प्रत्येकाला इथली भूमी काम देते. या श्रमिकात जसा परप्रांतीय असतो तसा कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील भूमीपुत्रही असतो. राबतात सगळेच समान. मराठी भूमीपुत्र आहे म्हणून त्या कामगाराला कोणी अधिकचा मेहनताना, सवलती देत नाही. सगळय़ा श्रमिकांच्या समस्या सारख्याच. सर्वाना इथले उद्योग सामावून घेतात कारण गरज त्यांनाही असते. कामगारही आपल्या अन्नदात्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद देऊन या क्षेत्रात प्रगती साधतात. कोरोनाची साथ पसरल्यानंतर जसा परप्रांतियांनी तसाच त्रास स्थानिकांनीही भोगला आहे. परप्रांतियांमधील साडेसात लाख रेल्वेत बसून सुखरूप पोहोचले. काही चालत, सायकल, गाडे, गाडय़ा अशा मिळेल त्या साधनांचा वापर करत बाहेर पडले. तसेच या राज्यातील मराठी कामगारही आपापल्या गावाकडे चालतच सुटले. दुःख दोघांनाही सारखेच. परप्रांतियांना जितक्या सुविधा मिळाल्या तेवढय़ाही राज्य सरकारने स्थानिकांना दिल्या नाहीत. पाच, दहा दिवस इथले कामगारही चालत राहिले. घाटात त्यांचाही अपघाती बळी गेला. कोकणातील काही चाकरमान्यांचे मृतदेह नीट हातीही लागले नाहीत. जंगली श्वापदांनी देहाचे लचके तोडल्याने तुकडय़ांच्या अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांनी स्वीकारला. आपत्तीच्या काळात हाल होत असताना त्यात निसर्ग भेद करत नाही आणि सावरायचे म्हटले तरी कोणतीही व्यवस्था परिस्थिती संपूर्णतः हाताळू शकत नाही. पण, अशा परिस्थितीतही राजकारण सुचलेल्या आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राला बोल लावण्याचे काहीही कारण नाही. ते सत्तेवर उशिरा आले असतील पण, सप, बसपप्रमाणेच त्यांचा पक्षही त्या राज्यात प्रदीर्घकाळ सत्तेत होता. त्या काळात त्यांनी उद्योगधंदे उभारले असते तर महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत भैय्या लोक भटकले नसते. आपल्याच लोकांना केवळ काँग्रेसने दिल्या आहेत म्हणून हजारभर बसेस ते दाबून घेऊन बसले. या गाडय़ांपासूनच मजूर चालत राहिले. पण, योगींच्या सरकारला त्यांची दया आली नाही. काँग्रेसच्या सोडा, स्वतःच्याही गाडय़ा सोडल्या नाहीत. ते मानवतेच्या बाता मारत आहेत. प्रियांका गांधी यांनी योगी यांना तुम्ही तुमचे झेंडे त्या गाडय़ांवर लावा पण, लोकांना गाडीत बसू द्या. चार दिवसात 90 हजार लोक घरी पोहोचले असते असेही त्यांना सुनावले आहे. देशातील जनता हे सगळे पाहत आहे याचा बहुदा योगी यांना विसर पडला असावा. जसा त्यांच्या राज्यातून राबायला गेलेल्या लोकांना त्रास झाला त्याहून गंभीर हाल, अपेष्टा सोसत महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील कामगार अजूनही मुंबईत तळ ठोकून आहे. त्रास सोसतो आहे. कोरोनाचा बळी ठरतो आहे. पण त्याच्यासाठी राज्य सरकारला अजून पुरेशी तजवीज करता आलेली नाही. पाहुण्यांची आधी सोय लावण्याच्या नादात इथल्या स्थानिकांनी जे कष्ट सोसले त्या सर्वांच्या जखमेवर मीठ चोळून योगी आपल्या लोकांना खूष करायचा विचार करत आहेत. पण, आजही महाराष्ट्रातील कारखानदारांना उत्तर प्रदेशातून कामगार फोन करून महाराष्ट्र सोडला ही चूक झाली. इथे काहीच सोय नाही असे म्हणत आहेत. रोज किमान दोन कोटी कामगारांना सोडण्याची क्षमता असणाऱया रेल्वेचा सुयोग्य वापर केला नाही म्हणून वाजपेयी काळातील कृषीमंत्र्यांनी अश्ा़खt ढाळले आहेत. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी फाळणीनंतरची देशातील कामगारांची ही सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि आठ दिवसात त्यांना घरी परतायची सवलत देऊन मोदी ती टाळू शकले असते अशी टीका केली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे ‘पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नव्हे तर दलित आणि कामगाराच्या तळहातावर पेलली आहे’ हे वाक्य जगभरातील श्रमिकांचे महत्त्व सांगणारे आहे. उत्तर भारतातील कामगार आले नाहीत म्हणून महाराष्ट्रावर परिणाम होईल. पण, महाराष्ट्रातही तितकेच बेरोजगार कामाच्या प्रतीक्षेत आहेत आणि जिथे पोकळी निर्माण होते तिथे संधीही साधली जाते. या न्यायाने स्थानिकाला काम मिळेल. पण, त्याला न्याय मिळेल का? कुठल्याच राज्यात त्याच्या अपेक्षेइतके किंवा जगणे सुसहय़ होण्याइतकेही कोणी देत नाही. त्याला चणचण भासेल तरच कामावर येईल हे तत्त्व त्यामागे असते. त्यामुळे आज जरी योगी आदित्यनाथ पुळका आणून बोलत असले तरी हे बोल खरे करण्यासाठी जे कष्ट घ्यायला पाहिजेत तेवढी त्यांची तयारी नाही. एक तापाची साथ ज्यांना हाताळता आली नाही ते कोरोनाच्या साथीतील दुरवस्थेबद्दल बोलत आहेत. त्यांच्या राजकीय वक्तव्याच्या पलीकडे उत्तर प्रदेशातला श्रमिक बेहालीच्या स्थितीत उभा आहे. त्याला महाराष्ट्रात होतो, तिथले लोक सांभाळून घेत होते असे वाटते. हेच योगी यांना उत्तर आहे. संकट काळात जगातल्या कोणत्याही माणसाला आपली जन्मभूमीच आठवते. तो मातृभूमीला परत जायचाच विचार करतो. त्या कामगाराची तळमळ आणि योगींची फुकाची मळमळ यात फरक आहे तो हाच.
Previous Articleपॉप कॉर्न ऊर्फ लाह्या
Next Article पुणे विभागातून 1 लाख 69 हजार प्रवासी परराज्यात रवाना
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.