माजी नगरसेवकाचे मनपा आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील स्वच्छतेसाठी 700 लोकसंख्येमागे एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्याचा आदेश शासनाने दिला असल्याचे कारण सांगून स्वच्छता कर्मचाऱयांना कमी करण्याचा प्रकार महापालिकेतील स्वच्छता कंत्राटदारांनी चालविला आहे. अनगोळ येथील स्वच्छता कामगार 12 वर्षापासून सेवेत असताना कंत्राटदाराने कमी केले आहे. सदर कंत्राटदार कामगारांची सतावणूक करीत असल्याने कंत्राटदारावर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
स्वच्छता कामगार वेळेवर आणि व्यवस्थित काम करीत असताना देखील त्यांचे पगार कापणे, गैर हजर घालणे तसेच मानसीक त्रास देण्याचा प्रकार कंत्राटदारांनी चालवला आहे. अनगोळ येथील स्वच्छतेचे काम पाहणाऱया नागेश गोरल या कंत्राटदाराने राजु कोल्हार या कामगाराला कमी केले आहे. गेल्या 12 वर्षापासून सेवेत असलेल्या कामगाराला कमी केल्याने बेरोजगार बनला आहे. कोरोनाच्या कालावधीत सदर कामगाराने व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. सध्या कोरोनाची धास्ती अजुनही असल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत स्वच्छता कामगाराला कामावरून कमी केले आहे. सदर कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करीत असल्याबाबत यापूर्वी देखील तक्रार केली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही.
कामगारांना कमी का करण्यात येत आहे, अशी विचारणा केली असता 700 लोकसंख्येला एका कामगाराची नियुक्ती करण्याचा आदेश शासनाने बजावला असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक पाहता शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे असताना कामगार कपात करणे अयोग्य आहे. त्यामुळे सदर कंत्राटदाराची चौकशी करून येत्या दोन दिवसात कारवाई करावी, अन्यथा महापालिका कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशारा माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन सादर केले. याबाबत चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.