वार्ताहर / कारदगा
येथील शेतकऱयांनी जवाहर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेल्या ऊस पीक स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल सदर शेतकऱयांचा कारदगा तिसरी आघाडी विकासरत्न पीकेपीएस यांच्यावतीने प्रकाश हंडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
सुभाष ठकाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर अरुण नोरजे, शिवराम दुगाणे, लक्ष्मण पसारे, अत्ताउल्ला पटेल, रावसाब मानगावे, रावसाब भागाजे, चंद्रकांत खोत, शाहू वडगावे यांनी ऊसपीक स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल व कुमार हेगडे, संजय गावडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तिसऱया आघाडीचे प्रमुख राजू खिचडे म्हणाले, की जीवन जगत असताना समाजकारण व राजकारण महत्त्वाचे आहे. हे तत्त्व ठेवून आम्ही आतापर्यंत सर्व समाजातील लोकांना एकत्र करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. यावेळी अरविंद खराडे, कुमार हेगडे, अत्ताउल्ला पटेल, प्रकाश हंडे आदींनी तिसऱया आघाडीच्या या उपक्रमाला आपल्या मनोगतातून शुभेच्या व्यक्त केल्या. याप्रसंगी सोमराया गावडे, शीतल व्हनवाडे, संभा अवन्नावर, बटू हंडे, शौकत कलावंत, महादेव डांगे आदी उपस्थित होते.