प्रतिनिधी /बेळगाव
‘कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आर. पी. पाटील व अध्यक्ष म्हणून ऍड. राजाभाऊ पाटील उपस्थित होते. प्राचार्य एस. वाय. पाटील पुरोगामी सेवा दलाचे चिटणीस प्रा. सुरेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
नारायण खांडेकर यांचे आर. पी. पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर खांडेकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. यावेळी प्रा. आर. पी. पाटील म्हणाले, प्रा. एस. वाय. पाटील व त्यांचे बंधू एल. वाय. पाटील यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक परिवर्तनालाही महत्त्व दिले. तो काळ अत्यंत कठीण आणि संघर्षाचा होता. अशावेळी ग्रामीण भागातील कुटुंबांना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले हे महत्त्वाचे आहे. नारायण खांडेकर यांनी समाजाला ज्या विचारांची गरज आहे तेच विचार या पुस्तकात मांडण्यात आले आहेत, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना ऍड. राजाभाऊ पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सहकार्याने बेळगावमध्ये सत्यशोधक चळवळीला बळ मिळाले. येथे असलेल्या अनेक विचारवंतांनी कार्यकर्ते निर्माण केले आहेत. म्हणून या पुस्तकाला ‘कार्यकर्ते घडविणारे विद्यापीठ’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले.