काँग्रेसचे गोवा प्रभारी पी. चिदंबरम यांचे केपे गट काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत आश्वासन
वार्ताहर /केपे
गट समिती किंवा इतर समितीने शिफारस केलेल्या नावाला उमेदवार म्हणून न निवडता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून आलेल्या नावांमधूनच उमेदवार निवडला जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गोवा प्रभारी पी. चिदंबरम यांनी केपे गट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिले.
यावेळी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रकाश राठोड, आलेक्स सिकेरा, बीना नाईक, ज्यो डायस, एल्टन डिकॉस्ता, अवधुत आमोणकर, शंकर किर्लपालकर, सुभाष फळदेसाई व इतर हजर होते. पक्षातर्फे जो उमेदवार निवडला जाईल त्याच्यामध्ये निष्ठा, बांधिलकी व इतर गुण तपासून पाहिले जातील. तसेच गट समितीने कोणा एकाच्या बाजूने न वळता पक्षकार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कार्यकर्त्यांचे विचार, सूचना अंमलात आणल्या जातील व त्यानुसार पुढचे पाऊल उचलले जाईल, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.
चुकीची पुनरावृत्ती होऊ दिली जाणार नाही
2017 मध्ये गोव्यातील लोकांनी काँगेसला कौल दिला होता. असे असताना 10 आमदारांनी विश्वासघात केला. ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. गोव्यात अनेक समस्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची समस्या म्हणजे बेरोजगारी आहे. लोकांना नोकऱया मिळाल्या, तर अनेक समस्या सुटू शकतात. पण सरकारने यासाठी कुठलेच पाऊल उचललेले दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 कोटी नोकऱया देणार असे आश्वासन दिले होते. मात्र त्याच्या उलट नोटाबंदी, जीएसटी यामुळे तसेच कोराना महामारीच्या काळात अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या आहेत, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.
केपेत चांगला उमेदवार देऊ
केपे मतदारसंघात येणाऱया विधानसभा निवडणुकीकरिता चांगला उमेदवार दिला जाईल, असेही चिदंबरम यांनी सांगितले. येणाऱया दिवसांत राज्यस्तरावरील सर्व समित्या व इतर समित्या नेमल्या जातील. सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही त्यांनी सागितले .
फुटिरांना कायमचे निवृत्त करा
जे आमदार काँग्रेस पक्ष सोडून गेले त्यांना कायमचे निवृत्त करून घरी पाठवावे. लोकशाहीमध्ये लोकांना जे हवे तेच व्हायला हवे. नको ते प्रजेच्या माथ्यावर सरकारने लादू नये. गेल्या दहा वर्षांत सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती बरीच खालावली आहे. टॅक्सीवाले, शेतकरी, पोदेर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मी मुख्यमंत्री असताना ‘सेझ’ला लोकांनी विरोध केला होता. त्यानंतर मी लोकांच्या भावनेचा आदर करून ‘सेझ’ रद्द केले होते. तसेच आता सरकारने लोकभावनेचा आदर करून लोकविरोधी असलेले तीन प्रकल्प रद्द करावेत, अशी मागणी कामत यांनी केली.
आश्वासने पाळली नाहीत
तसेच अनेक खात्यांत अनेक वर्षांपासून रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. त्यांना सेवेत कायम करावे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात 50 हजार नोकऱया देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी किती नोकऱया दिल्या गेल्या. पेट्रोलचे दर 60 रुपयांच्या वर जाऊ देणार नाही असे ते म्हणत होते. ते दर आता 100 रु. वर पोहोचले आहेत. स्वयंपाकाचा गॅस 450 रुपयांच्या वर जाऊ देणार नाही असे म्हणत होते. तो आता 800 च्या गेला आहे. चार वर्षांपूर्वी युवकांना बेकारी भत्ता देणार असे सांगितले जात होते. किती जणांना तो मिळाला, असे अनेक प्रश्न कामत यांनी उपस्थित केले. सरकारला मतदारांनी जाब विचारावा, असे ते म्हणाले.
लोकांना लाचार बनवू नये
लोकांना आपल्या पायांवर उभे करावे, त्यांना लाचार बनवू नये, असा टोलाही भाजप व आपला त्यांनी हाणला. केपे मतदारसंघाने सदैव काँग्रेससोबत राहून पक्षाचा उमेदवार निवडून दिला आहे. ती परंपरा कायम राखावी, असे कामत यांनी सागितले. विरोधी पक्षनेतेपदावर असताना नेता विश्वासघात करून भाजपमधे दाखल झालेला असला, तरी मतदार या विश्वासघाताला विसरलेले नाहीत. येणाऱया दिवसांत अनेक अफवाही उठतील. त्यांना बळी पडू नका, असे आवाहन चोडणकर यांनी केले. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन कार्य करण्याची गरज आहे, असे राव यांनी सांगितले.
मालू वेळीप यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी केपे भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष मालू वेळीप हे गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपवर नाराज आहेत व त्यांनी जिल्हा पंचायत निवडणूक भाजप उमेदवाराच्या विरोधात लढवली होती. त्यांनी या काँग्रेस गट समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीत चिदंबरम यांनी कार्यकर्त्यांना आपल्या समस्या व काही सूचना असल्यास मांडण्यास सांगितले असता मालू वेळीप यांनी व्यासपीठावर जाऊन आपले विचार माडले. मात्र नंतर त्यांना पत्रकारांनी विचारले असता आपण काँग्रेस पक्षात अजून प्रवेश केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.