कारवार, हल्याळ, जोयडा, दांडेली तालुक्यात मुसळधार पाऊस : कोडसळ्ळी धरणातूनही विसर्ग
प्रतिनिधी / कारवार
अतिरिक्त पाण्याच्या विसर्गासाठी काळी नदीवरील कद्रा धरणाचे आठ तर कोडसळ्ळी धरणाचे चार दरवाजे गुरुवारी उघडण्यात आले. काळी नदी आणि कद्रा व कोडसळ्ळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कारवार, हल्याळ, जोयडा, दांडेली आणि यल्लापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दोन्ही धरणात मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून येत आहे. दोन्ही धरणे कुठल्याही क्षणी काठोकाठ भरण्याची शक्यता आहे. अतिरिक्त पाण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पुन्हा एकदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. कद्रा धरणात 50 हजार 219 क्युसेक्स इतके पाणी काळी नदीच्या पात्रात सोडून देण्यात येत आहे. यापैकी धरणाच्या आठ दरवाजातून 21 हजार 742 क्युसेक्स इतके तर उर्जा निर्मितीनंतर 20 हजार 703 क्युसेक्स पाणी काळी नदीच्या पात्रात सोडून देण्यात येत आहे.
कोडसळ्ळी धरणात 22 हजार 82 क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे. तर 22 हजार 393 क्युसेक्स इतके पाणी काळी नदीच्या पात्रात सोडून देण्यात येत आहे. धरणाच्या चार दरवाजातून सात हजार 768 इतके पाणी तर ऊर्जा निर्मितीनंतर 14 हजार 625 क्युसेक्स इतके पाणी नदी पात्रात सोडून देण्यात येत आहे.
दांडेली, यल्लापूरमध्ये जनजीवन विस्कळीत
गेल्या दहा-बारा दिवसांपासून किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. परिणामी किनारपट्टी जलमय बनून राहिली आहे. दांडेली, यल्लापूरसह घाटमाथ्यावरील तालुक्यात पाऊस झोडपून काढत आहे. परिणामी या तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. दांडेली नगरातील बहुतेक रस्ते जलमय बनून राहिले आहेत. यल्लापूर तालुकावासियांनी पावसाचा धसका घेतला आहे.
कारण गेल्यावर्षी आणि त्या अगोदरच्या वर्षात अतिवृष्टीने यल्लापूर तालुकावासियांना सळो की पळो करून सोडले होते.
कारवार तालुकावासीय भीतीच्या छायेखाली
कारवार तालुकावासीय काळी नदीला येणाऱया पूर किंवा महापूरपेक्षा कद्रा जलाशयातून सोडण्यात येणाऱया पाण्याची अधिक भीती बाळगून असतात. कारण गेल्या दोन वर्षात कद्रा धरणातून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. कोटय़वधी रुपयांची सरकारी मालमत्तेची हानी झाली आहे. आणि पुन्हा यावर्षीही नदीच्या किनाऱयावरील वास्तव्य करून असलेली जनता भीतीच्या छायेखाली वावरत आहे. आणि म्हणूनच कर्नाटक ऊर्जा महामंडळाच्या अधिकाऱयांनी वैज्ञानिकदृष्टय़ा आणि नियोजन पूर्वक पाण्याचा विसर्ग करावा, अशी मागणी कारवार तालुकावासियांच्याकडून केली जात आहे.
किनारपट्टीवर ओल्या दुष्काळाची भीती
गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. परिणामी संपूर्ण किनारपट्टी जलमय बनून राहिली आहे. एका बाजूला किनारपट्टीवर ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली जाण्याच्या, घरामध्ये पाणी घुसण्याच्या घटना घडत आहेत. तर दुसऱया बाजुला कृषी जमीन पाण्याखाली जावून शेतकऱयांचे प्रचंड हाल होत आहेत. लागवड केलेले भातपीक कुजण्याची शक्यता निर्माण झाली असून यावर्षी पुन्हा एकदा शेती व्यवसायाची पीछेहाट तर होणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दांडेली, यल्लापूर, मुंदगोड मधील जनजीवन विस्कळीत
दांडेली, यल्लापूरसह घाटमाथ्यावरील तालुक्यात पाऊस अक्षरशः झोडपून काढीत आहे. परिणामी या तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. दांडेली नगरातील बहुतेक रस्ते जलमय बनून राहिले आहेत. यल्लापूर तालुकावासियांनी पावसाचा भलताच धसका घेतला आहे. कारण गेल्यावर्षी आणि त्या अगोदरच्या वर्षात अतिवृष्टीने यल्लापूर तालुकावासियांना सळो की पळो करून सोडले होते.