वार्ताहर / कास :
कास पठारवरील रंगीबेरंगी रानफुलांचा फुलोत्सव 25 ऑगस्टपासुन पर्यटकांसाठी खुला होणार असल्याने या पठारकडे दररोज पर्यटकांच्या शेकडो वाहनांची रांग लागणार आहे. कास रस्त्याचे रुंदीकरण अनेक ठिकाणी झालेय खरे, पण काही ठिकाणी अद्याप अरूंदीकरण आणि साईडपट्टीच्या जागेवर भिंती बांधल्याने खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्ष उलटुनही अद्याप रस्त्याचे काम पुर्ण न झाल्याने ठेकेदाराला आणखी किती वर्षाची वाढीव मुदत दिलीय ? की मुदत संपल्यानेच गेल्या महिन्यात भर पावसात ठेकेदाराला काम उरकण्याची घाई झाली होती? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.
सातारा कास रोडवर फुलांच्या हंगाम काळात दरदिवशी हजारो वाहने येत असतात. त्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी चक्काजाम होतो. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण सुरु आहे. अद्याप यवतेश्वर घाटातील निम्मे काम बाकी असून यवतेश्वर मंदीराच्या जवळील अंदाजे 1 किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. घाटाई फाटय़ापर्यंतच्या फॉरेस्ट हद्दीतील मार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधुन रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. या ठिकाणी रस्ता अंरूद आहे. रोडला मातीची साईटपट्टीच नसुन बाजूला साईट कठडा अथवा कोणतेही सूचना फलक नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भर पावसात केलेले काम निष्कृष्ट दर्जाचे असून हेरीटेजवाडीच्या पट्टयातील डांबरीकरण महीन्याभरातच उखडू लागले आहे.