वार्ताहर / किणये
नुकत्याच झालेल्या किणये ग्रा. पं. च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये म. ए. समितीने बाजी मारली आहे. पुन्हा एकदा या ग्राम पंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्यात आला. यामुळे किणये भागातील नागरिकांमध्ये सीमाप्रश्नाविषयी असलेली तळमळ पुन्हा दिसून आली आहे. मंगळवारी किणये ग्राम पंचायतीचे नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संस्थापक स्व. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ग्रा. पं. अध्यक्षा स्नेहल लोहार, उपाध्यक्ष मल्लाप्पा पाटील, सदस्य विनायक पाटील, अशोक तोराळकर, मुकुंद डुकरे, शंकर लोहार आदी यावेळी उपस्थित होते. किणये विभाग हा म. ए. समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सीमाप्रश्नाच्या लढय़ासाठी या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी अनेक सीमालढय़ांमध्ये भाग घेतला आहे. ग्राम पंचायतीवर समितीचा झेंडा फडकवून या परिसरात म. ए. समिती बळकट करण्याचा प्रयत्न सध्याच्या तरुणांनी केला आहे.
सीमा लढय़ासाठी आम्ही कायम प्रयत्न करणार आहोत. तसेच किणये ग्रा. पं. कार्यक्षेत्रात येणाऱया गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व सदस्यांना घेऊन काम करणार, अशी माहिती अध्यक्षा स्नेहल लोहार व उपाध्यक्ष मल्लाप्पा पाटील यांनी तरुण भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.