ओडिशात एनडीआरएफच्या 13, बंगालमध्ये 17 तुकडय़ा तैनात
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अम्फान चक्रीवादळ आता तीव्र होऊ लागले आहे. उपसागराच्या मध्य भागात रविवारी रात्री अडीच वाजल्यापासून याचे स्वरुप मोठे होऊ लागले आहे. भारतीय हवामान विभागानुसार मागील 6 तासांमध्ये चक्रीवादळ उपसागराच्या दक्षिण भागातून उत्तरपूर्वेच्या दिशेने सरकले आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचा किनारी भागाला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
20 मेच्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशच्या हटिया बेटानजीक धडकू शकते. यादरम्यान चक्रीवादळाचा वेग 870 किलोमीटर प्रतितास राहणार असल्याचा अनुमान आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागांमध्ये वेगवान वारे वाहण्यासाठी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांनी घेतला आढावा
चक्रीवादळाला तोंड देण्यासाठीची तयारी तसेच यातून निर्माण होणाऱया स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. सर्वांच्या सुरक्षेची प्रार्थना करतो, केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाणार असल्याचे मोदींनी बैठकीनंतर सांगितले आहे.
एनडीआरएफ सक्रीय
अम्फात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशात 13 तर पश्चिम बंगालमध्ये 17 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची काही पथके आपत्कालीन स्थिती लोकांना मदत व्हावी याकरता एअरलिफ्टसाठी सज्ज राहणार असल्याची माहिती एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी दिली आहे.
12 तासांत वेग वाढणार
12 तासांमध्ये अम्फात चक्रीवादळ अत्यंत वेगवान होणार आहे. पुढील 6 तासांमध्ये याचा प्रभाव किनारी भागांमध्ये दिसू लागले. चक्रीवादळाचे केंद्र ओडिशाच्या पारादीपपासून 980 किलोमीटर अंतरावर दक्षिणेस, पश्चिम बंगालच्या दीघापासून 130 किमी अंतरावर दक्षिण-पश्चिमेस आणि बांगलादेशच्या खेपुपारापासून 1250 किमी अंतरावर असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली आहे.
या भागांवर पडणार प्रभाव
चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या 24 उत्तर आणि दक्षिण परगणा, कोलकाता पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा आणि हुगळीत अतिवृष्टी होऊ शकते. ओडिशात गजपति, गंजाम, पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपाडा, बालासोर, भ्रदक, मयूरभंज, झुमपुरा, सहारपाडा आणि क्योंझर जिल्हय़ात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.